
कोयनेच्या पाण्यावर होणार विचारमंथन
चिपळूण - कोयनेच्या अवजलामुळे चिपळुणात महापूर आला. नागरिकांच्या या दाव्यावर अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक गुरुवारी (ता. २६) पोफळी येथे होणार आहे. या बैठकीत खरच कोयनेच्या पाण्यामुळे चिपळूण शहरात पाणी भरले का? या विषयावर मंथन होणार आहे. कोळकेवाडी धरणामुळे खरच चिपळुणात पाणी भरते का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.
गेल्या वर्षी २२ जुलैच्या महापुरात चिपळूण शहरासह परिसर उद्ध्वस्त झाले. त्याला कोयना प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर सोडलेले अवजल हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मांडण्यात आली. त्यानंतर पवार यांनी पावसाळ्यात धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भातील उपाययोजना सुचवण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची निर्मिती केली. या अभ्यासगटात नऊ सदस्य असणार आहेत.
पावसाळ्यात सोडल्या जाणाऱ्या कोयना अवजल विसर्गाचा चिपळूण शहरावर होणारा परिणाम आणि त्या संदर्भातील उपाययोजना याबाबतचा अहवाल दोन महिन्यात शासनाला सादर करणार आहे. त्यासाठी या अभ्यासगटाचे अध्यक्ष मोडक यांच्याकडून येत्या गुरुवारी येथे पहिल्या बैठकीचे नियोजन केले आहे.
कोळकेवाडी धरणामुळे खरच चिपळुणात पाणी ?
याबाबत माहिती देताना मोडक म्हणाले, गेल्या वर्षी चिपळूण शहरात पूर आला. त्यात वाशिष्ठी नदी व कोयना अवजलाचा भाग किती होता, या संदर्भात आम्ही अभ्यास करणार आहोत. कोळकेवाडी धरणामुळे खरच चिपळुणात पाणी भरते का? याचाही अभ्यास केला जाणार आहे. ही बैठक केवळ अभ्यासगटापर्यंत मर्यादित आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61093 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..