
स्कूलबसचे खासगी प्रवासी वाहतुकीत रूपांतर
स्कूलबसचे खासगी प्रवासी वाहतुकीत रूपांतर
कोरोनातील शाळाबंदीचा फटका ; पालकांना भूर्दंड
चिपळूण, ता. १० ः चिपळूण तालुक्यातील खासगी आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरू होत आहेत. मुले शाळेत जाणार असल्याने पालकांची लगबग सुरू आहे. शाळांनीदेखील जय्यत तयारी सुरू केली आहे; पण, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवणाऱ्या बसगाड्यांचा यावर्षी तुटवडा आहे.
मागच्या दोन वर्षांत आर्थिक हप्ते थकल्याने बँका व फायनान्स कंपन्यांनी बस जप्त केल्या आहेत. काही बस घरासमोरच धूळखात पडल्या आहेत. काहींनी खासगी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणाऱ्या बसचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे याचा सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.
चिपळूण तालुक्यात स्कूल बस व व्हॅनद्वारे दररोज किमान चार ते पाच हजार विद्यार्थ्यांची वाहतूक होते. यात सर्वाधिक संख्या ही स्कूलबसमधून होते. ती संख्या अडीच ते तीन हजार इतकी आहे. दोन वर्षांपूर्वी सुमारे २५ स्कूलबसची वाहतूक होत होती. त्यात आता घट झाली आहे. १५ हून अधिक बस सेवेतून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोचण्यासाठी पालकांची धांदल उडणार आहे.
--------------
चौकट
का निर्माण झाला प्रश्न ?
कोरोना काळात शाळा बंद झाल्या. स्कूलबस चालकांचे उत्पन्न बंद झाले. बँका व फायनान्स कंपनीचे हप्ते थकले, त्यामुळे वाहन जप्त झाले. तर काही चालकांनी आपले वाहन विकून दुसरा व्यवसाय सुरू केला. दोन वर्षे स्कूलबस बंद असल्याने आता ती सुरू करण्यासाठी लाखात खर्च अपेक्षित आहे. यात त्यांच्या देखभालीपासून ते विम्याचे हप्ते, आरटीओ पासिंग आदींचा खर्चदेखील करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक स्कूल बसचालक एवढी रक्कम खर्च करून पुन्हा हा व्यवसाय सुरू करण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे अनेक बसचालकांनी या व्यवसायातून माघार घेतली आहे. एसटीच्या संपकाळात अनेक स्कूलबसने पुणे, मुंबई रत्नागिरी मार्गावर खासगी वाहतूक सुरू केली. स्कूलबसपेक्षा खासगी वाहतुकीत पैसे चांगले मिळत असल्यामुळे अनेकांनी विद्यार्थी पोहोचण्याकडे पाठ फिरवली आहे.
-----------
चौकट
८० टक्के वाहतूक खासगी
शाळेत जाणाऱ्या एकूण वाहतुकीपैकी सुमारे ८० टक्के वाहतूक ही खासगी आहे. यात स्कूलबस, व्हॅन व रिक्षाच्या माध्यमातून वाहतूक होते तर शाळेच्या स्वतःच्या आठ ते दहा टक्के बस आहेत. शिवाय, १० टक्के पालक आपल्या पाल्यांना शाळेत स्वतः सोडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणांत वाहतूक ही खासगी वाहनाद्वारे होते.
-----------
कोट
स्कूलबसची संख्या घटली हे खरे आहे. अनेकांच्या गाड्या जप्त झाल्या. काहींच्या महापुरातही सापडल्या. अनेकांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे; पण, त्यांचा आता सिबिल स्कोअर खराब झाल्याने त्यांना नवीन कर्ज मिळणार नाही तर काहींकडे गाड्यांच्या दुरुस्तीसाठी पैसे नाहीत. त्यामुळे गाड्या बंद आहेत.
- विक्रम शेलार, बसचालक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66556 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..