
राज्य सरकारवरील भरोसा उडाला
31017
सावंतवाडी : येथे पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. सोबत संजू परब, लॉरेन्स मान्येकर. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
सरकारवरील भरोसा आता उडाला
राजन तेली ः फडणवीसांच्या चमत्कारात कोकणचेही आमदार होतील सहभागी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः राज्यातील सत्तेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच चमत्कार दिसून येईल आणि या चमत्कारात कोकणातील आमदार सहभागी होतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला.
श्री. तेली यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, सुधीर आरीवडेकर, रवींद्र मडगावकर, राजू बेग, आनंद नेवगी, लॉरेन्स मान्येकर, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, संजू शिरोडकर, गुरू मठकर, सत्यवान बांदेकर आदी यावेळी उपस्थित होते.
तेली म्हणाले, ‘‘राज्यसभा सदस्य निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीतही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी चमत्कार घडवून आणला आणि विधान परिषद निवडणुकीत १३४ मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर शिवसेना आमदारांचा भरोसा राहिला नाही, हे एकप्रकारे दिसून आले. जनतेने स्पष्ट बहुमत देऊनही शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे राज्यात भाजप सरकार आले नसले तरी शिवसेनेच्या आमदारांना काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत राहणे शक्य नव्हते, ही खदखद आज बाहेर आली आहे. त्यामुळे राज्यात चमत्कार होईल आणि देवेंद्र फडवणीस राज्याची काळजी वाहतील.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असतानाचे प्रकल्प या सरकारने बंद केले. त्यामुळे या सरकारला जनतेच्या रोषासोबत आता आमदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. कोकणातील आमदार साथ देतील, असा विश्वास आहे. शिवाय कोकणातील खासदार, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आमदार हे भाजपचे कसे होतील, यासाठी सध्या भाजपची व्यूहरचना सुरू आहे. २४ ला माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. कोकणातील खासदार भाजपचे असावेत म्हणून यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत नियोजन केले आहे. या पुढील काळामध्ये कोकणातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा या सर्व भाजपच्या ताब्यात याव्यात म्हणून नियोजन सुरू असून जिल्ह्यातील तिन्ही आमदार हे भाजपचे बसतील.’’
---
केंद्राकडून मोठा विकास
ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आठ वर्षांत मोठा विकास केला आहे. यापूर्वी झालें नाही असे विकासाचे आणि जन कल्याणाच्या योजना आणल्या आहेत. हिंदूत्व भाजपाचा श्वास आहे. राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे पंतप्रधान मोदी यांनी भरपूर वर्षांनंतर घडवून आणले आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये समाधान मानलं जातं आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70309 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..