
सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी
32666
जामसंडे ः मुसळधार पावसामुळे बुधवारी येथील रस्ते भरून वाहात होते. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी
पावसाचा पुन्हा जोर ः नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २९ ः एक दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात आज पहाटेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात सरी कोसळत आहेत. या पावसामुळे भातरोप लागवडीला वेग आला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता.२४) पावसाचा जोर वाढला. सोमवारपर्यंत (ता.२७) मुसळधार पाऊस झाला; परंतु मंगळवारी (ता.२८) पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली. पुन्हा आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्याभर सरीवर सरी कोसळत आहेत. वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीच्या देवगड, मालवण, वेंगुर्ले तालुक्यांमध्येही अधूनमधून जोरदार पाऊस तर इतर वेळी हलक्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे तिलारी, गडनदी, शुक यासह इतर सर्व नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. दमदार पाऊस पडत असल्यामुळे भातरोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. शेतशिवारे शेतकऱ्यांनी गजबजून गेल्याचे चित्र गावागावांत आहे. पुढील दोन तीन दिवसांत भातरोप लागवडीला आणखी गती येण्याची शक्यता आहे.
तुलनेत मात्र मागे
जिल्ह्यात यावर्षी १० जूनला मॉन्सूनचे आगमन झाले; परंतु त्यानंतर अपेक्षित पाऊस झाला नाही. तब्बल आठ ते दहा दिवस पावसाविनाच गेले. त्यानंतर गेले चार-पाच दिवस दमदार पाऊस पडत आहे. असे असले तरी गेल्यावर्षी २९ जूनपर्यंत सरासरी १०२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत ८५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्हा पावसात पिछाडीवरच आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72753 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..