
शरद पवार
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद
आनंदाने स्वीकारलेले नाही : शरद पवार
पुणे, ता. ३० : आसाममध्ये जे सहकारी गेले त्याचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्री पदापेक्षा अधिक होती; पण भाजपमध्ये आदेश एकदा आला दिल्लीचा आदेश असेल किंवा नागपूरचा आदेश असेल त्यामध्ये तडजोड नसते. त्यामुळं हा आदेश आला त्याचा परिणाम म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हावं लागले, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
श्री. पवार म्हणाले आदेश दिल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे काम केले, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले होते. एकदा आदेश झाला की सत्तेची कोणतीही संधी स्वीकारायची असते, याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला कुणाला माहिती नव्हत्या. एकदा मुख्यमंत्री पदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेतील अन्य पद स्वीकारण्याचे उदाहरण यापूर्वी होते. माझ्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण माझे अर्थमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते, त्यात ते मंत्री होते. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी नंतर मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची कृती आश्चर्यकारक वाटली नाही.
‘ते’ पुन्हा आले पण...
आता जे मुख्यमंत्री झाले ते एकनाथ शिंदे ठाण्याचे प्रतिनिधी आहेत, पण ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील आहेत. यशवंतराव चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील होते. बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील होते. एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्ह्याला लॉटरी लागली, असे म्हणता येईल.
आज एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी पडली. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि अपेक्षा व्यक्त केल्या. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर शपथ घेतल्यानंतर पक्षाचा प्रतिनिधी असला तरी तो राज्याचा प्रमुख होतो. राज्याचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा त्यांना बोलून दाखवली आणि शुभेच्छा व्यक्त केल्या, असे शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे शिवसेनेतील लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. ४० आमदार बाहेर जातात, ही साधी गोष्ट नाही. ती नेण्याची कुवत शिंदे यांनी दाखवली, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाशी माझा अधिक संपर्क राहिलेला नाही. या सर्वाची तयारी फार पूर्वीपासून सुरू होती. सुरत ते गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास झाला. उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी द्यायची, अशा स्वभावाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची, विधिमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती, त्याचा हा परिणाम असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73106 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..