
चिपळूण ः अतिवृष्टीत परशुराम घाट वाहतूकीसाठी बंद
ratchl55.jpg
३३९७०
घाटात कोसळणाऱ्या दरडी
परशुराम घाट वाहतुकीसाठी बंदच
परशुराम डोंगरात भेगा; महामार्ग विभागाकडून अहवाल
चिपळूण, ता. ५ ः शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळल्याने सोमवारी (ता. ४) सायंकाळी ५ वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परशुरामच्या डोंगरात लहानशा भेगा पडल्या आहेत. या ठिकाणचा ५ मीटरहून अधिक लांबीचा डोंगराळ भाग कधीही कोसळण्याचा संभव आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अतिवृष्टीत घाटातील वाहतूक बंद ठेवा, असा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, घाटातील वाहतूक बंद केल्याने लोटे परिसरात अवजड वाहनांच्या २ किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. अडकलेली वाहने खाली सोडण्याचे काम दुपारनंतर सुरू होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रविवारी रात्री दरड कोसळली होती. या घटनेनंतर वाहतुकीसाठी घाट बंद करून वाहतूक चिरणी लोटेमार्गे वळवली होती. त्यानंतर अवजड वाहने वगळता छोटी वाहने या मार्गावरून सोडली जात आहेत. लोटे ओद्योगिक वसाहतीमधील मोठ्या बसची वाहतूकदेखील बंद केली असून पर्यायी व्यवस्था म्हणून कामगारांसाठी छोटी बस सोडली जात आहे. तसेच या मार्गावर चोवीस तास नजर ठेवण्यात आली असून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी परशुराम गावात काही ठिकाणी पडलेल्या भेगांची पाहणी केली. त्यापाठोपाठ आमदार भास्कर जाधव यांनीदेखील पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गचे राज्य मुख्य अभियंता संतोष शेलार, कोकण भवनचे अधीक्षक अभियंता एस. एन. गायकवाड, कार्यकारी अभियंता एल. बी. जाधव, उपविभागीय अभियंता प्रकाश निगडे, शाखा अभियंता रॉजर मराठे आदी अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीत घाट बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तूर्तास घाटातील वाहतूक बंदच असून पुढील तीन-चार दिवस घाट बंद राहण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून घाटात जेसीबी, पोकलेन, डंपर आदी यंत्रणा तैनात केल्या आहेत. या घाटातील सुरक्षा व्यवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नियोजन केले जात आहे. त्यासाठी ठेकेदार कंपनीला खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एस.टी. सेवा बंद
चिपळूण-खेड मार्गावरील एस.टी. सेवा परशुराम घाटातील धोकादायक परिस्थितीमुळे पूर्णतः बंद ठेवली आहे. सोमवारी ४ गाड्या व्हाया पुणे, मुंबई अशा सोडण्यात आल्या. त्यानंतर या मार्गावर देखील एस.टी. बस सेवा बंद केली आहे. जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोवर या एसटी. सेवा बंद राहणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74501 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..