
दापोलीत पावसामुळे पडझड
दापोली तालुक्यात
पावसाने पडझड
दाभोळः दापोली तालुक्यात जोरदार पावसाने सुरवात केली असून त्यात कळंबट येथील मंदिराची संरक्षण भिंत पडून नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. तालुक्यात गेले चार दिवस पावसाने थैमान घातले असून त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाली असली तरी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या पावसामुळे शेतकरी आनंदात असून लावणीच्या कामांना सुरवात झाली आहे. आज सकाळपर्यंत दापोलीत १२२४.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (ता. ५) दिवसात २१०.८० मिमी पाऊस पडल्याची माहिती कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. या पावसामुळे कळंबट येथील प्रसिद्ध असलेल्या श्री धावजी मंदिराची संरक्षक भिंत कोसळली आहे. यामुळे मंदिराचे आर्थिक नुकसान झाले आहे.
-------------
दापोलीला पावसाळी
पर्यटनाची प्रतीक्षा
दाभोळः मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्याला आता पावसाळी पर्यटनाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यात आकर्षण असणारे धबधबे प्रसिद्धीच्या झोतात नसल्याने पर्यटकांच्या गाड्या दापोलीकडे वळत नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील मुरूड, कर्दे, लाडघर, दाभोळ, केळशी, पाळंदे, आंजर्ले आणि माशांसाठी प्रसिद्ध असणारे हर्णै ही गावे पावसाळ्यापूर्वी पर्यटकांनी गजबजून जातात; मात्र पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांविना हाटेल व्यावसायिक हॉटेलची डागडूजी करणे आदी काम करतात तर कर्मचारी शेतीची कामे करणे अशा कामांमध्ये व्यस्त होतात. पावसाळ्याचे चार महिने हॉटेल व्यावसायिकांना व कर्मचाऱ्यांना घरातच बसून काढावे लागतात; परंतु जर पावसाळी पर्यटन सुरू झाल्यास या व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येतील. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यावरही किरकोळ प्रमाणात पर्यटक दापोलीत आले असून, काही रिसॉर्टमध्ये ग्रुपने पर्यटक येत असल्याचे दिसत आहे. दापोली तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी मात्र अनेक सुविधांची वानवा आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे, मोबाईल नेटवर्क नसणे अशा असुविधांमुळे पर्यटक नाराजी व्यक्त करतात.
-------
बुरोंडीतील पुलाची
उंची वाढवावी
दाभोळ ः सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दापोली तालुक्यातील बुरोंडी देवके येथील किरकशी या पुलावर पाणी भरत असल्याने वाहतूक बंद होत असून रिक्षा, बस, दुचाकी वाहने ही काही तासापुरती बंद करण्याची वेळ येत आहे. जोपर्यंत पुलावरील पाणी कमी होत नाही तोपर्यंत या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना तेथेच थांबावे लागते. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू होते. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात असल्याने या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74659 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..