
चिपळूण ःजाधवांनी काढले नेत्यांना चिमटे
मेळाव्यात आमदार जाधवांचे सेना नेत्यांना चिमटे
राजकीय वर्तुळात चर्चा; पक्षांतर्गत विरोधकांना दिला संदेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना चिपळूणमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आमदार जाधव यांनी मार्गदर्शन करताना शिवसेनेच्या नेत्यांना चिमटे काढले. निर्धार मेळाव्यातील त्यांचे हे चिमटे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार जाधव यांचा २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी चिपळूण मतदारसंघ आणि शिवसेना सोडली. राजकीय कारकिर्दीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून राजकारणात सक्रिय राहण्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघ निवडला; परंतु चिपळूणमधील घडामोडींवर त्यांचे बारकाईने लक्ष होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते पुन्हा शिवसेनेत आले. त्यामुळे चिपळूणमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
चिपळूणमध्ये संघटनेसाठी काम करण्यात त्यांनाही रस असल्याचे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवले. मात्र, संघटनेच्या कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना दिले जात नव्हते. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन आले. त्या वेळी शिवसेनेतील जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यांनी आमदार जाधव यांना सक्रिय होण्याची विनंती केली; परंतु काहींनी त्यांना विरोध केला. त्यामुळे जाधव हे चिपळूणपासून अलिप्तच होते. मात्र, निर्धार मेळाव्याला उपस्थित राहून त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली. मी त्या काळात शिवसेना सोडली, याचे अनेकांना दुःख आहे; पण मी शिवसेना सोडल्यानंतर कोणावरही राग व्यक्त केला नाही किंवा कोणावर टीका केली नाही. आज शिवसेनेतून जे गेले, ते उघडपणे गेले; पण पक्षात राहून जे राष्ट्रवादीला मदत करण्यास सांगतात, अशी माणसे पक्षात घातक आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांचा इशारा कोणाकडे होता, याची चर्चा आज सर्वत्र सुरू होती.
२००४ च्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली, म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आणि जाधवांचा पराभव झाला होता. २०१९ च्या निवडणुकीतही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला छुपी मदत केली, म्हणून शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. जाधव यांचा रोख नेमका कोणावर होता, याची चर्चा दिवसभर सुरू होती. निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने आमदार जाधव यांनी चिपळूणमधील पक्षांतर्गत विरोधकांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
-------------------------
चौकट
जाधव समर्थकांना हिणवले जाते
२००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर चिपळूणमधून भुईसपाट झालेली शिवसेना आम्ही वाढवली, असे सांगत भास्कर जाधव समर्थकांना हिणवले जाते. गेली १८ वर्षे हा प्रकार सुरू आहे. अशाप्रकारे हिणवणाऱ्या लोकांचाही मी समाचार घेणार आहे. आज त्यावर बोलण्याची वेळ नाही; पण त्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी मेळाव्यात दिला. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76597 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..