
चिपळूण ः चिपळूणच्या शिवसेनेतही बंडखोरी
शिवसेनेतील बंडखोरीचे लोण चिपळूणमध्ये
बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर; दुसऱ्या फळीला थोपवलेय
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यभर शिवसेनेला धक्के बसत आहेत. ही बंडखोरी आता चिपळूणमध्येही येऊन पोहोचली आहे. चिपळूणमधील शिवसेनेचा बडा नेता मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम शिंदेंच्या बंडात सामील झाले. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव पक्षाबरोबर राहिले. चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. आमदार साळवी आणि आमदार जाधव शिंदे गटात जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना फोडून शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोच प्रयत्न चिपळूणमध्येही सुरू आहे.
शिवसेनेचे आमदार फोडताना अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धावून घेण्यासाठी चिपळूणमधील शिवसेनेच्या काही नेत्यांनी ठाणेवारी केल्याची चर्चा आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता पैशासाठी फुटत नाही, असे सांगितले जाते; मात्र २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेच्या काही नेत्यांनाच वळवून घेतले त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले, असा आरोप सुरू असताना मागील १८ वर्षे निष्ठेने शिवसेना वाढवणारे नेते आता पक्षाच्याविरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात चिपळूणमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये भाजपची ताकद मोठी नाही; मात्र शिवसेनेतील नेते पक्षापासून वेगळे झाले आणि भाजपच्या मदतीला आले तर चिपळूण तालुक्यातही शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मदत करण्याची हमी देत काहींनी ठाणेवारी करत गंगाजल आणले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वातावरणनिर्मितीसाठी दुसऱ्या फळीतील नेत्यांचे बंड थांबवण्यात आला आहे.
-----------
चौकट
गरज लागली मी तातडीने बाहेर पडलो
चिपळूण, गुहागरमध्ये बंड झालेले नाही; मात्र ज्या पद्धतीने आर्थिक आमिष दाखवून शिवसेनेच्या नेत्यांना फोडले जात आहे ते पाहता चिपळुणात बंडखोरी होणार नाही, असे सांगता येत नाही. जो कोणी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करेल, अशा गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिकांच्या बळावर मोठे व्हायचे आणि नंतर शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून जायचे, असा प्रयत्न कुणी केला तर त्याला शिवसैनिकही सोडणार नाहीत. मी सक्रिय राजकारणापासून अलिप्त होतो, पण पक्षाला माझी गरज लागली मी तातडीने बाहेर पडलो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोन आला तेव्हा काळजी करू नका, मी रत्नागिरी जिल्ह्यात बैठका घेत आहे. वातावरण चांगले आहे, असे त्यांना सांगितले. पक्षसंकट असताना झोकून काम करणारा खरा शिवसैनिक असतो, असे माजी खासदार अनंत गीते यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76951 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..