
चिपळुणात ओहोटीच्यावेळी पाणीपातळी तपासणी
वाशिष्ठीच्या पात्रातील पाणी पातळीची तपासणी
भरती, ओहोटीनुसार अभ्यास; दर तासाला घेतली नोंद
चिपळूण, ता. १५ ः कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठीला सोडण्यात येणाऱ्या अवजलाचा भरती व ओहोटीच्यावेळी कितपत प्रभाव पडतो, याचा अंदाज अभ्यासगटाकडून घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी भरतीच्यावेळी वाशिष्ठी नदीपात्रातील पाणीपातळीची नोंद घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा नदीला ओहोटी असताना पहाटे पाच ते सकाळी सव्वानऊदरम्यान कोळकेवाडी धरणातून पाणी सोडले असता सहा ते सात ठिकाणच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. याबाबतचा परिपूर्ण अहवाल अभ्यासगटाकडून सादर केला जाणार आहे.
गतवर्षी २२ जुलैला आलेल्या महापुरामागची कारणे शोधली जात आहेत. पुरावेळी पडलेला पाऊस, कोळकेवाडी धरणातील झालेला पाण्याचा विसर्ग आजूबाजूच्या परिसरातील धरणांची पातळी या सर्व नोंदी एकत्रित घेऊन अभ्यासगटामार्फत शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. यापूर्वी ३० जूनला उच्चतम भरतीच्या वेळी कोळकेवाडी धरणातील पाणी सोडून नदीची पातळी घेतली होती.
चौकट
अशी करण्यात आली नोंद
शुक्रवारी सकाळी ७ वा. निच्चतम ओहोटी होती. त्या वेळी पहाटे ५ वाजल्यापासून नदीच्या मुळ पाण्याची पातळी घेण्यात आली. त्यानंतर दर तासाने ११ वाजेपर्यंत पाण्याची पातळी घेण्यात आली. पहाटे ५ वाजताची ही पातळी शून्य पातळी म्हणून नोंद केली. ५ ते ९ दरम्यान कोळकेवाडी धरणातून पूर्ण क्षमतेने ८ हजार ७०० क्युसेक पाणी वीजनिर्मिती करून वाशिष्ठी नदीपात्रात सोडण्यात आले. या पाण्याची ही पातळी दर तासाने मोजण्यात आली. तिसऱ्या टप्प्याचे पाणी कोयना कोळकेवाडी धरणाच्या पायथा विद्युतगृहातून पूर्ण क्षमतेने सोडल्यानंतर निच्चतम ओहोटीच्या वेळी दर तासागणिक पातळी कशी आणि किती वाढते, याची नोंद विविध ठिकाणच्या रिव्हर वॉटरगेज स्टेशनमार्फत मोजण्यात आली. त्याचवेळी कोळकेवाडी तिसरा टप्पा ते चिपळूण शहरदरम्यान पाण्याच्या प्रवासासाठी किती वेळ लागतो, याचीही नोंद घेण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77610 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..