
चिपळूण ः दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी
36869ः संग्रहीत
..................
दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी
बंडानंतरचे चित्र; शिंदे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः राजकीय स्वार्थासाठी नेत्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या की कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. ते केवळ खुर्च्या आणि सतरंजी उचलण्यापर्यंत मर्यादित राहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधी बंडखोरी केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आमदार त्यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या मतदार संघातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील शिवसैनिकांना आता काम करून दाखवण्याची संधी मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक व पदाधिकारी तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन बंडखोर आमदार अशी सध्याची स्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात उदय सामंत आणि योगेश कदम गेल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत शिवसेनेचे दोन गट पाहायला मिळणार आहेत. पुढील अडीच वर्ष दुभंगलेल्या अवस्थेतच जिल्ह्यातील शिवसेनेची वाटचाल राहणार असल्याचे चित्र आहे. मूळच्या शिवसैनिकांना कोणी फोडू नये, यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र करून घेतले जात आहे. तर दुसरीकडे आम्ही शिवसेनेतच आहोत, असे म्हणणारे बंडखोर आमदार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
व्यक्ती आणि लक्ष्मीप्रेमी कार्यकर्ते बंडखोरांबरोबर जात आहेत. मात्र, पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहूनच वाटचाल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात एकीकडे शिंदे गटाची शिवसेना तर दुसरीकडे मूळची शिवसेना अशी दुफळी जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांना नेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
दापोली मतदारसंघात सूर्यकांत दळवी यांचे वर्चस्व होते. तेथे राष्ट्रवादीने संजय कदम या दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी दिली. शिवसेनेतील अदृश्य शक्तीच्या बळावर संजय कदम निवडून आले. त्यानंतर माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम या मतदारसंघातून निवडून आले. रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते यांचा पराभव झाला. त्यानंतर सूर्यकांत दळवी आणि अनंत गीते राजकारणातून बाजूला फेकले गेले. मात्र, योगेश कदम यांनी बंडखोरी केल्यानंतर गीते आणि दळवी दोघेही सक्रीय झाले आहेत.
...
चौकट
उदय बने यांना ताकद...
दहा वर्षापूर्वी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने हे विधानसभेसाठी प्रमुख दावेदार होते. मात्र, उदय सामंत यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय बने मागे पडले. आता उदय सामंत यांनी बंडखोरी केल्यानंतर मूळ शिवसैनिक असलेले उदय बने यांना ताकद देण्यासोबत सभासद संख्या वाढवून स्थानिक स्वराज्य संस्थांतील ताकद अबाधित राखण्यासाठी पक्षाकडून जोर लावला जात आहे.
-----------
चौकट
मुळचे शिवसैनिक कितपत साथ देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिदे गटाकडून मूळच्या शिवसैनिकांना फोडण्याचे राजकारणही सुरू झाले आहे. मुळचे शिवसैनिक कितपत साथ देणार यावर सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत. सध्या मूळ शिवसेनेची जबाबदारी पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते राजन साळवी, प्रवक्ते भास्कर जाधव, माजी खासदार अनंत गीते यांच्यावर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनाच काम करावे लागणार आहे.
-------------
कोट
शिवसेनेत प्रत्येका योग्यवेळी सन्मान केला जातो. बंडखोरीमुळे दोन मतदार संघात कार्यकर्त्यांना मैदान मिळाले आहेत. शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र करून घेतले जात आहे. मी ही प्रतिज्ञापत्र केले. शिवसेनेची ताकद जिल्ह्यात आहे. कार्यकर्ते कुठेही गेलेले नाहीत. ते पक्षाबरोबरच आहेत, हे दाखवण्यासाठी पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिज्ञापत्र केले जात आहेत.
-संदीप सावंत, तालुकाप्रमुख, चिपळूण
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78331 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..