
योग क्रीडांचा ऑलिम्पिकात समावेशाचा विचार
L37122
बांदा ः येथे योगाबद्दल माहिती देताना स्वामी आनंद देव महाराज.
L37123
बांदा ः योगोपचारात सहभागी नागरिक.
योग क्रीडांचा ऑलिम्पिकात समावेशाचा विचार
आनंद देव महाराज ः निरोगी आरोग्यासाठी योग साधना गरजेची
निलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १९ ः भारतीय आयुर्वेदात योग, प्राणायामला अनन्यसाधारण महत्व आहे. सशक्त, निरोगी व मजबूत भारत निर्माण करायचा असेल तर मुलांना लहान वयातच योगाभ्यासाचे धडे देणे ही काळाची गरज आहे. जागतिक स्तरावरील प्रगत देशांनीदेखील योगाचे महत्व स्वीकारले असून भविष्यात नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमातून योग क्रीडांचा समावेश हा ऑलिम्पिकमध्ये करण्याबाबत विचार सुरु आहे. हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. निरोगी आरोग्यासाठी योग साधना गरजेची असून नियमित योगा केल्याने व्यक्तीचे आरोग्याचे बजेट हे शून्य होऊ शकते, असा दावा हरिद्वार येथील योग गुरु व बाबा रामदेव यांचे परम शिष्य स्वामी आनंद देव महाराज यांनी ''सकाळ''शी बोलताना केला आहे.
ते म्हणाले, "योगा, प्राणायाम केल्याने माणसाच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपले शरीर, बुद्धी, मन हे सातत्याने तजेलदार राहते. शारीरिक स्वास्थ्य राखायचे असेल तर उत्तम आहाराबरोबरच योग प्राणायाम देखील आवश्यक आहे. यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे जगाचे पर्यायाने देशाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. हे भरून काढण्यासाठी योगाभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे. योग अभ्यास केल्याने मनात सात्विकता निर्माण होते. मनातील राग, द्वेष नष्ट होतात. यामुळे प्रतिकारशक्ती वाढल्याने आपण जीवनात व्याधी मुक्त होऊ शकतो. योग ही भारताची प्राचीन संस्कृती आल्याने ही आपल्यासाठी खऱ्या अर्थाने जीवन विद्या आहे.
धकाधकीच्या जीवनात कमी वयात अनेक व्याधी, रोग शरीरासाठी जीवघेणे ठरत आहेत. यावर मात करण्यासाठी युवा पिढीला योग विद्या देणे ही काळाची गरज आहे. आपल्या दिनचर्येमध्ये योगाला महत्व दिल्यास व्यक्तीचा आर्थिक, शारीरिक व मानसिक विकास होऊ शकतो. हरिद्वार येथे यासाठी युवकांना मोफत योगाचे प्रशिक्षण देण्यात येते."
ते पुढे म्हणाले, "नियमित योगा करणे हे उत्तम आरोग्याचे प्रतीक आहे. यामुळे शरीराचे शुद्धीकरण व सशक्तिकरण होते. वात, किडनी, पित्त, रक्तदाब, खोकला, हृदयरोग तसेच इतर शारीरिक आजार टाळण्यासाठी योग विद्या महत्वाची आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून वृद्धानपर्यंत कोणीही योगा करू शकतो. योगाच्या माध्यमातून आयुर्वेद व प्राकृतिक चिकित्साचे अंगीकरण करणे ही काळाची गरज आहे. देशात योगाची जगजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे. पतंजलीकडे देशातील लाखो लोकांचे लेखी अनुभव आहेत ज्यांचे असाध्य रोग देखील योग विद्येने बरे झाले आहेत. जगातील प्रगत देशांनी देखील योग विद्येला स्वीकारले असून ते त्यावर संशोधन देखील करत आहे. हे भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. आपल्या विद्येचा प्रसार देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत व्हावा यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तरच भविष्यात शक्तिशाली भारत निर्माण होऊ शकतो."
-----------
चौकट
शासनाने पाठबळ
मिळणे आवश्यक
मुलांना लहान वयातच योग संस्कार देणे ही काळाची गरज आहे. हेच संस्कार त्यांच्यासाठी आयुष्यभर सोबत राहतात. भारतात हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यात शाळा, महाविद्यालयात योग अभ्यासिका सुरु आहेत. महाराष्ट्र राज्यात योग अभ्यास सुरु करण्याबाबत शासनाने विचार करावा. राज्यात योग आयोगाची स्थापना करणे गरजेचे आहे. शाळेत प्राथमिक स्तरावर आठवड्यातून १ ते २ दिवस योगाभ्यास मुलांना द्यावा. शालेय पातळीवर प्राणायम केले तर मुलांच्या बुद्धीमत्तेत तर सूर्यनमस्कार केल्याने मुलांच्या शारीरिक विकासात वाढ होऊ शकते. नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशनच्या माध्यमातून भविष्यात योग क्रिडांचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार असल्याने याचा मोठा फायदा भारतीयांना मिळू शकतो. योगा हा आपला खेळ असल्याने जागतिक पातळीवर देशाचे नाव निर्माण करू शकतो. माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी योग विद्या ही काळाची गरज असल्याने शासनाने या कार्याला पाठबळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78777 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..