
रत्नागिरी-सामंताना भेटलेले 20 नगरसेवक शिवसेनेतच
सामंतांना भेटलेले ते २० नगरसेवक शिवसेनेतच
राजन साळवी; पक्षांतर्गत नियुक्त्या, रामदास कदमांबाबत मात्र मौन
रत्नागिरी, ता. २० : जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. सेना तळागाळात रुजली असून ती आहे तिथे आहे. रत्नागिरीतील २० नगरसेवक उदय सामंत यांना भेटले असतील, मात्र ते अजूनही शिवसेनेशी प्रामाणिक आहेत, असा दावा शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना केला. मात्र, पक्षांतर्गत हकालपट्टी आणि नियुक्त्या आणि रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाबाबत मौन पाळले.
राज्याच्या शिवसेनेला पक्षांतर्गत खिंडार पडल्यानंतर जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार योगेश कदम आणि उदय सामंत हे एकनाथ शिंदे गटात गेले. सामंत यांना समर्थन देणाऱ्या युवा नेत्यांना हटविले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी दौरा केला तेव्हा उपजिल्हा प्रमुख, शहरप्रमुखांनी त्यांची भेट घेतली. त्याची माहिती मातोश्रीवर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सामंत गटातील पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी केली. त्याच्या जागी मूळ सेनेतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. मात्र, सामंत गटाने सेनेला झटका देत, काही तासात राजीनामा दिला. त्यानंतर सेनेच्या २३ पैकी २० नगरसेवकांनी उदय सामंत यांना समर्थन दिले. सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले तेव्हा २० नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन समर्थन दर्शविले होते, यावर साळवी म्हणाले, ‘उदय सामंत नेते आहेत. अनेक वर्षे ते राजकारणात आहेत. ते आल्यानंतर त्यांना नगरसेवक भेटायला गेले याचा अर्थ ते त्याच्याबरोबर गेले असे नाही. ते २० नगरसेवक आजही सेनेशी प्रामाणिक आहेत, सेनेबरोबर आहेत’. शहर आणि जिल्हा कार्यकारिणीवरील काही पदाधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले. नवीन नियुक्त्यांबाबत मला याबाबत माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंवर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्यांवर टीका झाली. यावर साळवी म्हणाले, ‘रामदास कदम यांच्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही, आमचे वरिष्ठ त्याला उत्तर देतील. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा कोणताही परिणाम सेनेवर होणार नाही. कोण कुठे गेले तरी सेना आहे तिथेच राहणार. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयाने पुढची तारीख दिली असली, तरी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच हा निकाल लागेल, असेही त्यांनी सांगितले.
चौकट-
उदय सामंत मला भावासारखे : बंड्या साळवी
शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, उदय सामंत हे मला भावासारखे आहेत. त्यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले आहे. कोण कुठे गेले, तरी शिवसेना आहे तिथेच आहे. यापूर्वी सेनेचा आमदार किंवा खासदार नसतानाही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका सेनेकडेच होत्या. यापुढेही तालुक्यासह जिल्ह्यात हेच चित्र असेल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79292 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..