
मोर्येंचे १५ आॅगस्टला पुन्हा उपोषण
भूसंपादन मोबदल्यासाठी
मोर्येंचे १५ला पुन्हा उपोषण
कणकवली,ता. ५ ः मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये भूसंपादनानंतर मोबदला न मिळणे, स्थानिक शेतकऱ्यांच्या शिवारातील पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे, या विरोधात सामाजिक कार्यकर्ते नागेश मोर्ये हे उपोषणाला बसणार आहेत. याआधी त्यांनी २५ जुलैला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले होते. मात्र महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा श्री.मोर्ये यांनी दिला आहे.
नांदगाव (ता.कणकवली) येथे नागेश मोर्ये यांची जमीन संपादित झाली आहे; मात्र, या जमिनीच्या मोबदल्यासह अनेक समस्या आहेत. याबाबत त्यांनी वारंवार संबंधित खात्याशी पत्रव्यवहार केला. महसूल अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनही निर्णय झालेला नाही. याचा थेटपणे फटका नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. शेतामध्ये पावसाचे पाणी साठल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांना अजूनही जमिनीचा मोबदला मिळाला नाही. महामार्गाच्या चौपदरीकरणात मोर्ये यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याबाबत त्यांनी वारंवार आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. गेल्या २५ जुलैला त्यांनी उपोषणही केले. तेव्हा राजकीय पक्षाचे नेते आणि विविध खात्याचे अधिकारी भेट देऊन आश्वासन देऊन गेले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने नागशे मोर्ये यांनी पुन्हा एकदा १५ ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84212 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..