
टुडे पान एक-कृषी केंद्रांवर करडी नजर
PNE14G58848-1
कृषी केंद्रांवर करडी नजर
काळ्या बाजारावर लक्ष; कणकवलीतील दोन केंद्रांचे परवाने रद्द
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः बियाणे, खते व कीटकनाशकांच्या काळ्याबाजारावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाद्वारे जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यातील २ कृषी सेवा केंद्रांचे बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत तर सावंतवाडी तालुक्यातील दोन व कुडाळ तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राला ताकीद देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर यांनी दिली.
जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच त्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी, जास्त दराने विक्री होत नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशी एकूण ९ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या भरारी पथकांद्वारे कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये त्रुटी आढळून आल्याने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली होते. तसेच या कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये कुडाळ तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आल्याने त्या एका कंपनीच्या भात बियाण्याच्या विक्रीवर या पथकामार्फत बंदी घालण्यात आली होती. तसेच कणकवली तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राच्या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आल्याने तर दुसऱ्या कृषी सेवा केंद्राच्या तपासणी दरम्यान आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने पथकामार्फत विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. या सर्व विक्री बंदी घालण्यात आलेल्या कृषी सेवा केंद्रांकडून खुलासा मागविण्यात आला होता. या कारवाई अंतर्गत कणकवली तालुक्यातील २ कृषी सेवा केंद्रांचे बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर कणकवली तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राची सुनावणी बाकी आहे. तसेच सावंतवाडी तालुक्यातील २ व कुडाळ तालुक्यातील १ या तीन कृषी सेवा केंद्रांच्या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आल्याने त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. त्या सुनावणी दरम्यान यापुढे अशा त्रुटी आढळून आल्यास परवाने रद्द करण्यात येतील, अशी सक्त ताकीद या तीनही कृषी सेवा केंद्रांना देण्यात आली आहे.
------------
चौकट
भरारी पथकांना अधिकार
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची दर महिन्याला तपासणी करण्याचे अधिकार आहेत. तसेच विक्री केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्या विक्री केंद्रावर तात्काळ विक्री बंद करण्याचे अधिकार या पथकांना आहेत. अशा विक्री केंद्रांवर जप्ती आणण्याचे अधिकार या पथकांना देण्यात आलेले आहेत. बोगस बियाणे, खत, कीटकनाशके विक्रेत्यांचे विक्री परवान्यावर कारवाई करण्यासाठी त्यांचे अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करण्याच्या सूचना या भरारी पथकांना देण्यात आलेल्या आहेत.
------------
कोट
बाजारपेठेत अनेक नवीन कंपन्या आणि विविध ब्रँडच्या माध्यमातून कीटकनाशके उपलब्ध झाली आहेत. यात काही कंपन्यांकडून बोगस विक्री केली जाऊ शकते. खते, कीटकनाशके खरेदी करताना नागरिकांनी फुटलेले, गळके डबे, सिलपॅक नसलेल्या बाटल्यांतील किटकनाशके खरेदी करू नयेत. मुदत संपली नसल्याची खात्री करावी. प्रमाणित व मान्यता प्राप्त कंपनीचे कीटकनाशक खरेदी करावे. खते व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले घ्यावीत.
- डी. एस. दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84227 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..