
‘काव्यलहरी’ला देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद
41218
देवगड ः येथे विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण प्रसंगी मान्यवर.
‘काव्यलहरी’ला देवगडात उत्स्फूर्त प्रतिसाद
काव्य लेखन, वाचन स्पर्धा; विविध गटात परब, लाड, शिंदे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः येथील स. ह. केळकर महाविद्यालय आणि शेठ म. ग. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘काव्यलहरी’ या जिल्हास्तरीय स्वरचित मराठी काव्य लेखन आणि वाचन स्पर्धेत शालेय गटात गौरव परब (कणकवली), महाविद्यालयीन गटात मालिनी लाड (कणकवली) तर खुल्या गटात श्रेयस शिंदे (कणकवली) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कविवर्य वसंत बापट आणि कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘काव्यलहरी’ या जिल्हास्तरीय स्वरचित मराठी काव्य लेखन आणि वाचन स्पर्धेची अंतिम फेरी शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृह झाली. स्पर्धेचे परीक्षण अजय कांडर, मालवणी कवी रिजारिओ पिंटो आणि अॅड. अपर्णा परांजपे-प्रभू यांनी केले.
श्री. पिंटो यांनी आपल्या मालवणी कविता सादर केल्या. अॅड. परांजपे-प्रभू यांनी कवितेच्या लेखनातील बारकावे थोडक्यात सांगून आपल्या कवितांचे सादरीकरण केले. यावेळी व्यासपीठावर परीक्षक आणि मान्यवरांसह शेठ म. ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक संजीव राऊत उपस्थित होते. शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात एकूण ९० स्पर्धकांचा सहभाग होता.
सविस्तर निकाल अनुक्रमे असा ः शालेय गट-गौरव परब (कणकवली), नीलेश पराडकर (देवगड), माही साटम (देवगड), महाविद्यालयीन गट-मालिनी लाड (कणकवली), गुणाली घाडी (देवगड), सुचिता मांजरेकर (देवगड), खुला गट-श्रेयस शिंदे (कणकवली), विद्या मोरे (कुडाळ), जान्हवी लोक (देवगड) आणि अशोक आठलेकर (मालवण, विभागून) यशस्वी ठरले.
मराठी विभाग प्रमुख हेमश्री चिटणीस यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना आर. व्ही. तेली, पी. के. अणावकर, एच. के. राणे, एस. एस. तारी, एम्. एस. तेली यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी चंद्रहास मर्गज, तुकाराम तेली आणि सुधीर साटम उपस्थित होते. श्रावणी मराठे हिने वसंत बापट आणि शांता शेळके यांच्या गीतावरील नृत्याविष्कार सादर केला. तसेच शेठ म. ग. हायस्कूल आणि देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समुहगीते सादर केली. प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे यांनी प्रास्ताविक केले. हेमश्री चिटणीस यांनी आभार मानले.
--
कव्यनिर्मितीची गरज
श्री. कांडर म्हणाले की, कविता करणे एक कला आहे. काळाच्या ओघात आपले जगणे बदलते आणि जगण्याबरोबरच कलेचे संकेत बदलतात. म्हणूनच कवीने नेहमी बदलत्या व्यवस्थेला विचारात घेऊन काव्यनिर्मिती केली पाहिजे. कवितेवर वेळोवेळी संस्कार केले पाहिजेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84629 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..