
बक्षिसपत्र न होता पाणी योजनेचे काम
rat३०२२.txt
( टुडे पान ३ मेन)
हातीव गावात पाणी योजनेचे काम सुरू
विहीर, टाकीच्या जागेचे बक्षीसपत्र पूर्तता नाही ; माजी सरपंच गोंधळी यांचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ३० ः हर घर नलसे जल या योजनेचा संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावातून बोजवारा उडाल्याच्या तक्रारी असूनही ग्रामीण पुरवठा विभाग मात्र ढीम्म असल्याने जनतेला हक्काचे जल मिळत नाही. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरुद्ध जनतेतून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील हातिव गावात जलजीवन योजनेतून पाणीयोजना मंजूर झाली आहे. यातील विहीर व टाकीसाठीचे बक्षिसपत्र झालेले नसतानाही योजनेचे कामकाज सुरू कसे करण्यात आले, असा प्रश्न माजी सरपंच विलास गोंधळी यांनी गटविकास अधिकारी देवरूख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
निवेदनात म्हटले आहे, नवीन योजनेचे अंदाजपत्रक तयार झाले त्याला मंजुरी नसतानाही विहीर व टाकीचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या योजनेच्या मंजुरीबाबत माहिती ग्रा. पं. ने गावात कोणालाही दिलेली नाही. ग्रामसभेसमोर या योजनेबाबत मंजुरीपत्र न दाखवता विद्यमान सरपंच यांनी काम तूर्तास बंद करून प्रभागवार सभा घेऊन योजना गावासमोर ठेवून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे नमूद केले; मात्र मंजुरी पत्र दाखवलेले नाही व प्रभागवार सभाही अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. विहीर व टाकीसाठी जागेचे बक्षीसपत्र केलेले नाही तरीही काम कसे सुरू झाले, याचा खुलासा ग्रामसभेत केलेला नाही.
यापूर्वीही गावातील पाणीयोजनेतील विहिरीसाठी बक्षिसपत्र नसल्याने ती योजना जागामालकाने रखडवून पाणी बंद केले होते. याचीच पुनरावृत्ती या वेळीही होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच अधिकारीवर्गाला हाताशी धरून काम करून जनतेला वेठीस धरू नये, अशी अपेक्षा व्यक्त करत मागील बंद असलेल्या व या वेळच्या योजनेची तरी बक्षिसपत्रे करून पाणीयोजनेची कामे नियमानुसार गावातील जनतेला विश्वासात घेऊन करावीत, अशी मागणी गोंधळी यांनी केली आहे.
-