शिवसेनेच्या विरोधामुळेच विकास रखडला

शिवसेनेच्या विरोधामुळेच विकास रखडला

L80891
राजन तेली

शिवसेनेच्या विरोधामुळेच विकास रखडला

राजन तेली ः प्रकल्प झालेच नाहीत, भाविकांच्या गैरसोयीबाबत दिलगिरी

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ ः शिवसेनेच्या प्रकल्‍प विरोधी भूमिकेमुळेच सिंधुदुर्गचा विकास रखडला, असा आरोप भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केला. वाहतूक कोंडीमुळे आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांना जो त्रास झाला, त्‍याबद्दल आम्‍ही दिलगीर असल्‍याचेही ते म्‍हणाले.
येथील भाजप कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत जिल्‍हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत उपस्थित होते.
यावेळी तेली म्‍हणाले, "आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने भाजपची सर्व नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी सिंधुदुर्गात येतात. या सर्व नेतेमंडळींच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या विकासाला न्याय मिळावा, यासाठी आनंद मेळावा घेतला होता. यात प्रचंड उपस्थिती होती. त्‍यामुळे हतबल झालेले आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत या मेळाव्यावर टीका करत आहेत. सिंधुदुर्गचा विकास रखडण्याला सर्वस्वी शिवसेना जबाबदार आहे. सी-वर्ल्डच्या भूसंपादनासाठी १३० कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्री राणे यांनी आणला होता; पण खासदार राऊत, आमदार नाईक यांनी त्‍याला विरोध केला.
नाणार रिफायनरी प्रकल्‍पातूनही प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे; मात्र त्‍यालाही शिवसेनेचे खासदार राऊत विरोध करत आहेत. शिवसेना नेत्‍यांना सिंधुदुर्गचा विकास नकोय. इथल्‍या भूमिपुत्रांना इथेच रोजगार मिळावा, अशी त्‍यांची इच्छा नाही."
तेली पुढे म्‍हणाले, "शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व विकासकामे रखडली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी निधीच आला नाही. या उलट शिंदे-भाजप युतीचे सरकार येताच सिंधुदुर्गातील नऊ रस्त्यांची तातडीने कामे झाली. घोटगे-सोनवडे घाटरस्त्याचेही काम लवकरच पूर्ण होईल. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रेल्‍वेस्थानके आंतरराष्‍ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर विकसित होतील. किनारपट्टीवर पर्यटकांसाठी सुविधाही निर्माण होणार आहेत."
----------
चौकट
वरिष्‍ठांच्या मार्गदर्शनानंतर विरोध मावळला
आमदार नीतेश राणे यांनी नाणार प्रकल्‍पाला विरोध केला, ही वस्तुस्थिती आहे; मात्र भाजपच्या वरिष्‍ठ नेत्‍यांनी या प्रकल्‍पाबाबत मार्गदर्शन केले. प्रकल्‍पामुळे होणाऱ्या विकासाची माहिती दिली. त्‍यामुळे राणेंचा नाणार रिफायनरी प्रकल्‍पाला असलेला विरोध मावळला, अशी माहिती तेली यांनी दिली.
------------
चौकट
राणेंवर टीका करण्याची नाईक यांची कुवत नाही
नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. सर्वात महत्‍वाच्या खात्‍यांपैकी उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. या उलट आमदार वैभव नाईक यांना ना पालकमंत्री केले की, कुठले महामहामंडळ देण्यात आले. वरिष्‍ठांना खूष करण्यासाठी ते राणेंवर आरोप करत आहेत; मात्र त्यांची तेवढी पात्रता नाही, असे तेली म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com