
रत्नागिरी - धीरज वाटेकर यांना ‘अक्षरमित्र’ पुरस्कार जाहीर
फोटो ओळी
-rat१०p३६.jpg ः KOP२३L८१८४५ धीरज वाटेकर
-----------
वाटेकर यांना अक्षरमित्र पुरस्कार
राजापूर, ता.११ ः चिपळुणातील लेखक आणि पर्यटन, पर्यावरण, ग्रंथचळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्यावतीने दिला जाणारा अक्षरमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. तळवडे (राजापूर) येथे सुरू होत असलेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी रविवारी (ता.१२) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राजापूर-लांजा तालुक्यातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड जोपासता यावी, यासाठी २०१५ पासून नियमित हे संमेलन भरवले जात आहे. वाटेकर कोकणच्या विकासाच्या चळवळीतील कार्यकर्ते आहेत. कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे लिखाण करत आहेत. विविध अभ्यासदौरे, निसर्ग, लेणी, पर्यटन अभ्यास, जंगलभ्रमण याकरिता हिमाचल, कन्याकुमारी ते अंदमान आणि भूतानपर्यंतचा प्रवास केला आहे. याद्वारे जमा झालेला सुमारे २५ हजार डिजिटल फोटोंचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
पर्यटन, पर्यावरण संवर्धन, बिगरमौसमी जंगलपेर अभियान, वृक्ष लागवड, बीजपेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, पर्यावरण जनजागृती, रमणीय निसर्ग छायाचित्रण, ग्रंथालय चळवळ कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन यासह ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थींनी या तीन चरित्र पुस्तकांचे लेखन केले आहे. गेट वे ऑफ दाभोळ आणि वाशिष्ठीच्या तीरावरून या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, व्रतस्थ या ज्येष्ठ कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्यावरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. विविध विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक आदी २५ हून अधिक संग्राह्य अंक आणि पुस्तिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. वाटेकर यांनी संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन (१२ हजार प्रतींचे वितरण) केले आहे.