
डायल 112 वर वर्षात 2 हजार 468 कॉल्स
rat१३२४.txt
(पान २ साठीमेन)
डायल ११२ संपर्काचे वाढते प्रमाण
वर्षात मदतीसाठी अडीच हजार जणांचा कॉल ; तात्काळ यंत्रणा दाखल ; नागरिकांचा विश्वास वाढला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : तुम्हाला अचानक काही अडचण आली, तुमच्यावर गंभीर प्रसंग ओढविण्याची शक्यता आहे, तर घाबरू नका, तुमच्या मदतीला आहे ‘डायल ११२’ हा क्रमांक. तत्काळ मदत मिळण्याच्या हेतूने उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे गेल्यावर्षी जिल्ह्यातून विविध प्रकारचे एकूण २ हजार ४६८ कॉल्स आले. शंभर टक्के या कॉलची खात्री करून अनेकांना मदत करण्यात आली, तर काहींचे प्राण वाचविण्यात आल्याचे पुढे आले.
तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. या क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ त्या व्यक्तीचे लोकेशन मिळते. त्यानंतर पोलिसांची एक टीम दहाव्या मिनिटाला घटनास्थळी दाखल होऊन, त्या पीडिताला मदत करते. जिल्ह्यात ५६ गाड्यांवर २०९ प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी त्यासाठी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर २०२१ मध्ये ही यंत्रणा जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये कार्यान्वित केली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या नियंत्रणाखाली ही यंत्रणा सुरू झाली. आता त्याची जबाबदारी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे यामुळे मुख्यालयातील १०० नंबर येणारे ४० टक्के बोगस कॉल आणि क्रॉस कनेक्शन बंद झाली आहे. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांचा तेवढा ताप कमी झाला आहे. डायल ११२ ही यंत्रणा आपत्कालीन स्थितीत सापडणाऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने शासनाच्या पुढाकाराने सुरू झाली आहे. जिल्हा पोलिस दलातील सुमारे २०९ कर्मचाऱ्यांना आणि चार ते सहा अधिकाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक चारचाकी आणि दुचाकी वाहने त्या पथकाला दिली आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाणे या यंत्रणेशी जोडले गेला आहे. दिवसाला साधारण पाच ते सहा कॉल येतात. यामध्ये नवरा दारू पिऊन विनाकराण मारहाण करत आहे, शेजारी नाहक त्रास देत आहे, घरात भांडणं सुरू आहेत, अपघात झाला आहे, वाहतुक कोंडी झाली आहे, शेजारी मोठ्याने लाऊड स्पिकर लावला आहे, गाडी बंद पडली आहे, रस्त्यावर मारहाण झाली आहे, अशा प्रकारे दररोज कॉल सुरू आहेत. गेल्या महिनाभरात डायल ११२ ला २ हजार ४६८ कॉल्स आले. अडचणी सापडलेल्या तातडीची मदत मिळावी, या उद्देशाने डायल ११२ ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कॉल आल्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशनची खात्री करून ही टीम दहाव्या मिनिटाला तिथे दाखल होते. त्याला प्राथमिक मदत करून संबंधित विषय स्थानिक पोलिस ठाण्यात वर्ग केला जातो. या फोनवर आतापर्यंत १०० टक्के कार्यवाही झाली आहे. काहींचे जीव देखील या फोनमुळे वाचले आहेत.
--
अशी होते कार्यवाही
या प्रणालीमध्ये ११२ हा हेल्पलाइन नंबर डायल केला तर तो कंट्रोल युनिटकडे जातो. तिथून ज्या भागातून फोन आला. त्या परिसरातील पोलिस ठाण्यात तत्काळ सूचना दिली जाते. त्यामुळे काही वेळातच मदत मिळते.
--
कोट
नागरिकांच्या मदतीसाठी ११२ हा हेल्पलाइन क्रमांक विनामूल्य आहे. यावरून आपतीच्या वेळी मदत मागता येते. त्याचप्रमाणे गुन्ह्याची माहिती देता येते. आतापर्यंत आलेल्या कॉलवर १०० टक्क कार्यवाही झाली आहे.
- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी