रत्नागिरी ः राज्य संरक्षित होण्यासाठी 8 कातळशिल्पांचा अंतिम प्रस्ताव

रत्नागिरी ः राज्य संरक्षित होण्यासाठी 8 कातळशिल्पांचा अंतिम प्रस्ताव

पान १ साठी

८३०४०

राज्य संरक्षितसाठी आठ कातळशिल्पांचा अंतिम प्रस्ताव
---
रत्नागिरी पुरातत्त्व विभाग; अश्मयुगीन संस्कृतीच्या वैशिष्ट्यपूर्ण ठेव्याला मिळणार राजाश्रय
रत्नागिरी, ता. १५ ः कोकणात अश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण अधोरेखित करणारी कातळशिल्प लवकरच राज्य संरक्षित होणार आहेत. रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील आठ कातळशिल्पे राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव रत्नागिरी पुरातत्त्व विभागाने शासनाला सादर केला आहे. दोन ठिकाणी त्रुटी आढळल्याने त्यात दुरुस्ती करून हा अंतिम प्रस्ताव दिला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे अश्मयुगी संस्कृतीच्या या ठेव्याला लवकरच राजाश्रय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोकणात आढळलेल्या कातळखोद शिल्पांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लिप्स असे म्हणतात. कोकणात आढळून येणारी कातळशिल्पे ही जांभ्या दगडांनीयुक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत. ही शिल्पे एका विशिष्ट जागेत न आढळता समुद्र किनाऱ्‍यालगत सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळावर अश्मयुगी संस्कृती रुजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणाऱ्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर एक हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांभोवती गूढकथांसह परंपरा आढळतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास त्यांचे संरक्षण आणि जतन होऊ शकते म्हणून सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले आणि अजूनही सुरू आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
रत्नागिरी पुरातत्त्व विभागाने रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील आठ कातळशिल्पे राज्य संरक्षित करावी, यासाठी प्रस्ताव दिला आहे. यापूर्वीही प्रस्ताव गेला होता. मात्र, त्याला मंजुरी मिळाली नव्हती. मात्र, या आठ कातळशिल्पांना राज्य संरक्षित करण्यासाठीचा अंतिम अधिसूचनेसाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. लवकरच त्यावर निर्णय झाल्यास याबाबत संबंधित महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि कातळशिल्प असलेल्या भागात हरकतीबाबत नोटिसा लावल्या जाणार आहेत. मात्र, अजून या अंतिम अधिसूचनेची प्रतीक्षा आहे.

या शिल्पांचा आहे समावेश
राज्य संरक्षित करण्यात येणाऱ्या बारसू, भगवतीनगर, चवेल, देवीहसोळ, कशेडी, कातळगाव, उक्षी, वाढारूणदे या रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांतील आठ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या आठ ठिकाणांच्या कातळशिल्पांना राजाश्रय मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com