एनडीए सरकारचं करेल भारताला महान

एनडीए सरकारचं करेल भारताला महान

८३९७१
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षातर्फे येथे रविवारी झालेल्या विजय संकल्प रॅलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

वाढावा फोटो
83968
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी भाजपच्या विजय रॅलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, खासदार धैर्यशील माने, प्रकाश आवाडे, अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश खाडे, महेश जाधव, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, गोपीचंद पडळकर. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


‘एनडीए’ सरकारच करेल भारताला महान
---
विजय संकल्प रॅलीद्वारे केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी फुंकले रणशिंग
---
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सर्व ४८ जागा जिंकेल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत देशाला प्रगतिपथावर नेले. जगात भारत महासत्ता म्हणून पुढे येत आहे. आपल्याला आता महान भारताची रचना करावयाची आहे. ते कार्य ‘एनडीए’च करेल, असा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे विजय संकल्प रॅलीत रणशिंग फुंकले. ते म्हणाले, ‘‘त्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सर्व ४८ जागांवर विजय मिळवेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही श्री. शहा यांनी या वेळी केले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेत दिले. नागाळा पार्क येथे भाजप कार्यालयाशेजारी विजय संकल्प रॅली झाली.
श्री. शहा म्हणाले, ‘‘२०१४ पूर्वी देशाची जगातील प्रतिमा समाधानकारक नव्हती. पाकिस्तानी अतिरेकी जवानांची हत्या करीत होते. १२ लाख कोटींचे घोटाळे उघड होत होते. पंतप्रधान सोडून सगळे मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते. राज्यकर्ते गप्प होते. जनता हतबल होती. मात्र, २०१४ नंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाची ११ व्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवादाला सडेतोड उत्तर दिले. काश्मीरचे ३७० कलम रद्द केले. अयोध्येत भव्य राम मंदिर साकारत आहे. आता आपल्याला महान भारताची रचना करायची आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून संपूर्ण विजय आवश्यक आहे.’’
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभेचे प्रास्ताविक केले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुरेश खाडे, खासदार धनंजय महाडिक, संजय पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे नेते उपस्थित होते.

हव्यासापोटी उद्धव यांनी सत्ता तोडली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘सत्तेच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी २५ वर्षांची युती तोडली. त्यांचे म्हणणे आहे, की आमच्याबरोबर ते २५ वर्षे सडले; पण काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने अडीच वर्षांत ते संपले. काळाचा महिमा असा असतो. शिवसेना हा विचार आहे. एकनाथ शिंदे हा विचार जगले. त्यामुळे चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडे आहे. मालमत्ता वारसा हक्काने मिळते; पण विचार जागवावा लागतो. आमच्याशी ज्यांनी बेईमानी केली, त्यांना आम्ही सहा महिन्यांपूर्वी त्यांची जागा दाखवली. त्यांना असे चितपट केले की पुन्हा उठणार नाहीत. आता राज्यात शिवसेना आणि भाजपचे डबल इंजिन सरकार आहे. वेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण राज्याला विकासाच्या मार्गावर गतिमान केले आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com