
रत्नागिरी- व्हिलचेअरसह रत्नदुर्ग किल्ल्यावर दिव्यांगांची एंट्री
फोटो ओळी
rat21p34.jpg- KOP23L84323
रत्नागिरी ः आरएचपी फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे रत्नदुर्ग किल्ल्यावर व्हिलचेअरवरून पोहोचलेल्या राजश्री पाटील, कोमल माळी, योगिता काळे.
-----------
दिव्यांगानी केली रत्नदुर्ग किल्ल्याची सफर
रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन ; राजश्री पाटील, कोमल माळींनी केला आनंद व्यक्त
रत्नागिरी, ता. २१ ः पायाने अधू असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना एखाद्या किल्ल्यावर जाणे म्हणजे फारच त्रासदायक गोष्ट असते. त्यात अगदी व्हिलचेअर वापरणाऱ्यांना तर ही गोष्ट म्हणजे अशक्यच; परंतु रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनच्या सदस्यांनी दिव्यांग महिलांना रत्नदुर्ग किल्ल्यावर व्हिलचेअरवरून नेले आणि त्यांनी भगवतीदेवीचे दर्शन घेतले आणि अथांग समुद्र पाहिल्यानंतर अत्यानंद व्यक्त केला.
अहमदनगर येथील अनामप्रेम संस्थेच्या स्वयंचलन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये उद्योजिका व व्हिलचेअर वापरकर्त्यांची प्रेरणा असलेल्या राजश्री पाटील आणि व्हिलचेअर बास्केटबॉल खेळाडू कोमल माळी या सुद्धा होत्या. त्यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेनंतर आयोजक रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी समुद्रकिनाऱ्यावर सैर किंवा किल्लादर्शनासाठी त्यांना सुचवले. रत्नदुर्ग किल्ल्यावर व्हिलचेअर घेऊन जायचे कसे, असा प्रश्न पडला होता. किल्ल्यावर मुख्य दरवाजाने आत जाण्याकरिता सुमारे 40 पायऱ्या चढाव्या लागतात. हे अशक्य होते; परंतु नाकाडे यांचे बंधू व संस्थेचे सदस्य समीर नाकाडे यांनी राजश्री पाटील व कोमल माळी यांना व्हिलचेअरवर बसवूनच पायऱ्यांवरून वर नेले. या व्हिलचेअरच्या मागे उभे राहून योग्य तंत्राने खेचत, ताकदीने वर नेल्या. याकरिता संस्थेच्या सदस्यांचेही सहकार्य लाभले. या वेळी अनामप्रेम उपाध्यक्ष डॉ. प्रकाश शेठ, समन्वयक योगिता काळे, सहाय्यक अभिषेक भगेकर, उमेश पंडुरे, विद्या रानवडे हे सुद्धा उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मार्गदर्शन, सहकार्यासाठी रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनशी संपर्क साधा, असे आवाहन सादिक नाकाडे यांनी केले आहे.
-------------
चौकट
व्हिलचेअरचे तंत्र
अध्यक्ष सादिक नाकाडे हे सुद्धा व्हिलचेअर वापरतात. तीनचाकी व चारचाकी गाडीसुद्धा चालवतात. समीर नाकाडे यांनी सादिकभाईंना यापूर्वी अनेकदा व्हिलचेअरवरून योग्यप्रकारे तंत्र वापरून पायऱ्यांवरून वर नेले असून, खालीसुद्धा आणले आहे. त्यामुळे या सरावाचा उपयोग समीर नाकाडे यांना झाला. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर राजश्री पाटील व कोमल माळी यांनी भगवतीचे दर्शन घेतले आणि किल्ल्यावरून दिसणाऱ्या अथांग समुद्राचे दर्शन घेतले व अशक्य गोष्ट शक्य झाल्यामुळे त्यांना अत्यानंद झाला.