
पान पाच मेन-सच्चा शिवसैनिकांनी पक्षात यावे
84388
सच्च्या शिवसैनिकांनी पक्षात यावे
---
ब्रिगेडियर सुधीर सावंत; दादागिरीचे राजकारण करणार नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः जिल्ह्याच्या राजकारणात मी दादागिरीविरोधात लढलो. मला दादागिरीचे राजकारण आवडत नाही. त्यामुळे शिवसेना म्हणून अधिकृत नाव आणि चिन्ह मिळाले असले, तरी जिल्ह्यात दादागिरी करून काहीच मिळविणार नाही. त्यामुळे सच्च्या शिवसैनिकांनी आता खऱ्या शिवसेनेत यावे, असे आवाहन शिंदे गटाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यासाठी केलेले काम आणि त्यांची कामाची पद्धत लक्षात घेता २०२४ मध्येही तेच मुख्यमंत्री असतील. जनता त्यांना पुन्हा एकदा स्वीकारेल, असा दावाही ब्रिगेडियर सावंत यांनी केला. सावंत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नारायण राणे, योगेश तुळसकर, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते.
ब्रिगेडियर सावंत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर शिंदे यांनी चांगले काम केले. अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामुळे त्यांच्याबद्दल जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. वसंतदादा पाटील यांच्यानंतर चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे; तर दुसरीकडे न्यायालयाचा निकालही आता शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता आम्हीच खरे शिवसैनिक आहोत. काही झाले तरी आता शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून कोणी हटवू शकत नाही. पुढच्या निवडणुकीनंतरही तेच मुख्यमंत्री असतील.’’
ते म्हणाले, ‘‘शिवसेना म्हणून अधिकृत नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यावर अनेक शिवसैनिक तसेच अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. काल (ता. २०) नारुर-हिर्लोक येथे मोठे प्रवेश झाले. आता जिल्ह्यात अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्गात पक्ष संघटना बळकट झालेली दिसेल. अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील दहशतवाद अजून संपलेला नाही. आपण कालही दशहतवादाच्या विरोधात होतो आणि यानंतरची लढाईही त्याच दिशेने असणार आहे.’’
चौकट
उद्धव ठाकरेंना
कल्पना दिली होती...
‘राष्ट्रवादी’बरोबर गेल्यास शिवसेना संपणार, याची कुणकुण मला आधीपासूनच होती. याबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांना फोन करून कल्पनाही दिली होती; परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. ती भीती आज सत्यात उतरली, असेही या वेळी सावंत यांनी सांगितले.