
कर्तव्यनिष्ठा, कार्यगौरव पुरस्कार जाहीर
rat०४२.txt
बातमी क्र.. २ (पान ६ साठी)
कर्तव्यनिष्ठा, कार्यगौरव पुरस्कार जाहीर
बोडस ट्रस्ट ; प्रथमच एका वर्षी तीन महिलांचा समावेश
रत्नागिरी, ता. ४ ः गेली १० वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती व विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने २०२२ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि एक पुस्तक असे आहे. कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि तीन हजार रुपये असे आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी ३ महिलांना सन्मानित करण्यात येत आहे.
रत्नागिरी येथे सुमारे ४ दशके अग्निहोत्रविषयक कार्य करणाऱ्या आणि कर्मयोगिनी अशी ओळख असलेल्या विद्या पटवर्धन आणि व्यसनमुक्त गाव तुरळ (संगमेश्वर) येथील सामजिक कार्यकर्ते कृष्णा हरेकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यगौरव पुरस्कार चौघांना देण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्गातील शिरोडा (ता. वेंगुर्ला) येथील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयातील कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळणार आहे तसेच मरीन सिंडीकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका व तीन बंदरात जहाजावर जाऊन काम करणाऱ्या पहिल्या महिला अशा रत्नागिरी शहरातील अष्टपैलू संज्योक्ती सुर्वे यांना दिला जाईल. भिंगरोली (ता. मंडणगड) येथून सलग ५ वर्षे रुपये १ कोटीपेक्षा जास्त अल्पबचत गोळा करणाऱ्या नीलम जोशी आणि पाणथळ व पडिक जमिनीत उन्हाळी शेतीचा यशस्वी प्रयोग गेली २१ वर्षे करणारे चिंचघर-प्रभूवाडी (ता. खेड) येथील संजय पायरे यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पटवर्धन आणि सुर्वे यांचा गौरव महिलादिनाचे औचित्य साधून ८ मार्चला करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहराबाहेरील ३ सन्मानितांना पुरस्काराची रक्कम बँक ट्रान्स्फरच्या माध्यमातून दिली जाणार आहे. रत्नागिरीबाहेरील ४ सन्मानितांची सन्मानपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठवली जाणार आहेत, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार अॅड. आदिती पटवर्धन यांनी कळवले आहे.