
चिपळुणात केईएमच्या धर्तीवर रुग्णालय उभारावे
rat०४१०.txt
बातमी क्र..१० (पान २ साठी)
चिपळुणात केईएमच्या धर्तीवर रुग्णालय उभारावे
दिलीपराव चव्हाण ; मुख्यमंत्र्यांना निवेदन
चिपळूण, ता. ४ ः कोकणातील रत्नागिरी जिल्हा आजही वैद्यकीय सेवेच्या बाबतीत तितकासा प्रगतशील नाही. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे जिल्ह्याच्या टोकाला असल्याने मंडणगड व राजापूरसह अन्य तालुक्यातील रुग्णांना या रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेताना मोठी फरफट होते. उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्यकेंद्रातही योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. शासकीय रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने तेथे उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे चिपळुणात मुंबईतील केईएमच्या धर्तीवर अद्ययावत रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शिंदेगटाचे तालुका समन्वयक दिलीपराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत केली आहे.
कामथे येथे उपजिल्हा रुग्णालय आहे; मात्र तेथे आधुनिक वैद्यकीय सुविधा नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही मोठी कमतरता आहे. खासगी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना व अन्य शासकीय योजना खासगी रुग्णालयास लागू असल्या तरी शासकीय अनुदान घेऊनही रुग्णांना दिलासा मिळत नाही. परिणामी, अनेक रुग्णांना मिरज, कोल्हापूर, कराड, मुंबई व पुणे येथे आजही जावे लागते. यातून रुग्णांची ये-जा व उपचाराऐवजी अन्य गोष्टींसाठीच अधिक खर्च होतो. यात अनेक रुग्ण भरडले गेले असून त्याची ओरड नियमित होत आहे. याविषयी गंभीरपणे दखल घेऊन मुंबईतील केईएमच्या धर्तीवर चिपळूण येथे मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत शासकीय रुग्णालय उभारल्यास जिल्ह्यातील जनतेला त्याचा मोठा लाभ घेता येईल. निवेदन देताना माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सरपंच रूपेश घाग आदी उपस्थित होते.