
प्रशासकीय पातळीवर निधीसाठी प्रयत्नच नाही
rat०४२३.txt
बातमी क्र.. २३ (पान ५ साठीमेन)
प्रशासकीय पातळीवर निधीसाठी प्रयत्नच नाही
पालकमंत्र्यांकडून पाच कोटींची घोषणा ; वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी ५ कोटीचा निधी देण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली; मात्र प्रशासकीय पातळीवर त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ५ कोटीचा निधी मिळाला नाही. निधीअभावी दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम थांबण्यात आले आहे. त्यामुळे गाळाने गुदमरलेल्या नद्यांचा श्वास निधीअभावी थांबला आहे. पावसाळ्यापूर्वी गाळ न निघाल्यास ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
चिपळूण तालुक्यातील नद्यांचा गाळ उपसा करावा या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी गेल्या वर्षी साखळी उपोषण केले. त्याची दखल घेऊन तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी ९ कोटीचा निधी मंजूर केला. गेल्या वर्षी जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने लोकसहभागातून गाळ उपसा केला. त्यामुळे मागील पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. शासनाकडून मंजूर झालेल्या निधीपैकी ८० टक्के निधी गेल्या वर्षी खर्च करण्यात आला; मात्र वाशिष्ठी नदीतील गाळ अद्यापही शिल्लक आहे. पहिल्या टप्प्यातील गाळ काही प्रमाणात निघाला असला तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गाळ अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तत्कालीन सरकारने मंजूर केलेल्या निधीपैकी १ कोटी ३७ लाख रुपये शिल्लक राहिले होते. या निधीचा वापर करून टप्पा एक आणि दोनमधील गाळ उपसा सुरू होता. जलसंपदा विभागाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप चिपळूण बचाव समितीने केला. त्यानंतर शहरातील नागरिकांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक झाली. त्यांनी पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याची जबाबदारी नाम फाउंडेशनकडे दिली. बचाव समितीने निधीची मागणी केल्यावर ५ कोटीचा निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांकडून देण्यात आले; मात्र हा निधी जलसंपदा विभागाला मिळाला नाही. पहिल्या टप्प्यातील गाळ काढणाऱ्या नाम फाउंडेशनला शासनाकडून इंधन पुरवठा केला जात आहे. शिल्लक १ कोटी ३७ लाखात पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील गाळ निघणे शक्य नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम थांबवण्यात आले. दुसरा टप्पा बहादूरशेख नाक्यापासून पोफळीपर्यंत आहे. पोफळी येथे सह्याद्रीच्या खोऱ्यात वाशिष्ठी नदीचा उगम आहे. या भागातील नदी गाळाने भरलेली आहे. त्यामुळे स्थानिकांची शेती व घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. त्यामुळे पोफळीपासून वाशिष्ठी गाळमुक्त करण्याचे ठरले; मात्र दुसऱ्या टप्प्यात खेर्डी, शिरगाव, अलोरे येथे गाळ काढण्याचे काम सुरू असतानाच ते थांबण्यात आले आहे.
-
कोट
पालकमंत्री उदय सामंत यांनी ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली; मात्र हा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा आवश्यक होता तो झाला नाही त्यामुळे ५ कोटीचा निधी वेळेत मिळू शकला नाही. वेळेत निधी मिळाला तर पावसाळ्यापूर्वी धोकादायक बेट काढणे शक्य होईल.
- शाहनवाज शाह, जलतज्ञ, चिपळूण