
रत्नागिरी- भगवतीची होळी
rat७p४७.jpg- रत्नागिरी ः रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीच्या रूपात सजवलेला कुमार मुलगा पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात आंब्याची होळी नाचवत नेताना किल्लेकर, भाविक मंडळी.
(मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)
श्री भगवती देवीची आंब्याची होळी आणली नाचवत
रत्नागिरी, ता. ७ ः रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाला उत्साहात सुरवात झाली. काल (ता. ६) होळीच्या दिवशी दुपारी फगरवठार येथे ५० फूट आंब्याची होळी तोडण्यात आली. त्यानंतर ती नाचवत नाचवत भगवती मंदिरात नेण्यात आली. गावकरी, मानकरी आणि ट्रस्टीच्या, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथेप्रमाणे नवस बोललेल्या कुमार मुलाला देवीच्या वेशामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवून होळीसोबत फिरवण्यात येत आहे.
होळी पौर्णिमेला भगवती देवीच्या शिमगोत्सवासाठी बोललेल्या नवसाचा कुमार मुलगा देवीला अर्पण करण्याची प्रथा जपली जाते. या देवीसह मानकरी, देवीची बेताची काठी, बैठक, अंगाऱ्याची परडी, निशाण, अब्दागीरसह देवीच्या मंदिरातून ढोलताशा, नगार्यांच्या गजरात फगरवठार येथे पोहोचले. तेथे आंब्याच्या होळीची पूजा करून व गाऱ्हाणे घालून होळी तोडण्यात आली. होळी येणार असल्याने रस्त्यावर, दारात रांगोळी काढून पाट मांडलेले होते. या पाटावर देवी विराजमान झाली. तिची पूजा करून नवस फेडले गेले.होळीची मिरवणूक फगरवठार, गाडीतळ, गोखलेनाका, धमालणीचा पारमार्गे, खालची आळी, भैरीमंदिर मार्गे दांडा फिशरीज, भागेश्वर मंदिर, तळेकरवाडीमार्गे रात्री किल्ल्यावर पोहोचली. यामध्ये अब्दागीर, निशाण, मानकरी, विद्युत रोषणाई केलेल्या बैलगाडीचा समावेश होता. रात्री १२ वाजता होम करण्यात आला.
चौकट १
धूळवड साजरी
देवीच्या रूपाने सजवलेला लहान मुलगा, देवीची बेताची काठी, बैठक, अंगाऱ्याची परडी, निशाण व अब्दागीरसह किल्ला गावातील मानकरी, विश्वस्त, ग्रामस्थ सर्व होमातील राख घेऊन चव्हाटा, होळ देव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारूती, मुख्य मानकरी यांच्या घरातील देव, मारूती मंदिर पार, गणेशमंदिरात धूळवड उडवली. नंतर भैरीमंदिर, गुजर व खैर यांच्या घरी नंतर झाडगांव येथील सावंत यांच्या घरी जाऊन परत मंदिरात आले.