
ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास रुजवा
टीपः swt८१३.jpg मध्ये फोटो आहे.
सिंधुदुर्गनगरी ः क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना उमा प्रभू.
ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास रुजवा
उमा प्रभू; सिंधुदुर्गनगरीत क्षमता विकास प्रशिक्षण
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराचे उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. प्रशिक्षणातून परिवर्तन झाले पाहिजे. या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असे प्रतिपादन मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथे जनशिक्षण संस्थेच्या कार्यालयात आज महिलादिनी क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रभू यांच्या हस्ते झाले. जनशिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. शरद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे लुपिन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय कमिटी सदस्य योगेश प्रभू, यशस्वी सावंत, संचालक सुधीर पालव उपस्थित होते तसेच प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
सौ. प्रभू म्हणाल्या, ‘‘मानव विकास संस्था संचालित जनशिक्षण संस्थेच्यावतीने महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविण्याचा हा कार्यक्रम आहे. संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या परिवर्तनातून सुजलाम सुफलाम ग्रामीण भाग आणि जिल्हा व्हावा, यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्त्री ही बायको, आई, बहीण, मुलगी या नात्याने विविध रुपाने संबोधली जाते. तिच्यामध्ये असलेला न्यूनगंड घालवून एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. या हेतूने प्रशिक्षण देणाऱ्या महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा महिलांनी फायदा घ्यावा.’’
योगेश प्रभू यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर येथील कच्च्या मालावर विविध प्रक्रिया युनिट तयार झाले पाहिजेत. त्यासाठी गावागावांत असे प्रशिक्षण कार्यक्रम, रोजगारविषयक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. यावेळी क्षमता विकास कार्यक्रम व शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांबाबत पालव यांनी माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक उन्नती करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रमाकांत मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर पालव यांनी प्रास्ताविक केले. रमेश खरात यांनी आभार मानले.
--
केंद्राच्या विविध योजना
अध्यक्ष सावंत म्हणाले, ‘‘आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ कशी निर्माण करावी, याबाबत जनशिक्षणमार्फत केंद्राच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. फूड प्रोसेसिंगसारख्या तंत्रज्ञानातून जिल्ह्यात ११ प्रशिक्षण ग्रुप उभे केले आहेत. २५ टक्के लोक स्वतःच्या पायावर आज रोजगार करत आहेत. जिल्ह्यात १०० पुरुषांमागे १०७ महिला हे प्रमाण असून देशात आणि राज्यातही त्याचप्रमाणे प्रमाण वाढत आहे. मानव विकास संस्थेच्या माध्यमातून आर्थिक रोजगार निर्मितीवर भर दिला असून जिल्ह्यात, राज्यात परिवर्तन केंद्रे सुरू केली आहेत. पांग्रडसारख्या काही गावांत नाबार्डच्या माध्यमातून गट उभे केले जात आहेत. प्रशिक्षकांनी याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे.’’