
राजापूर ः बिबट्यांच्या खाद्याची व्यवस्था वनखात्याने करावी
बिबट्यांच्या खाद्याची व्यवस्था वनखात्याने करावी
आंबोळगड तंटामुक्ती समिती ; बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थ भयभीत
राजापूर, ता. १३ ः तालुक्यातील फणसेवाडी बांधवाडा पडवणे ते आंबोळगड गावामध्ये वाघ व बिबटे यांचे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसा व संध्याकाळी ६ वाजल्यानंतर बिबटे व वाघ रस्त्याच्या कडेने फिरत असतात. त्यामुळे गावामध्ये घबराट पसरली असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन असुरक्षित झाल्याची लेखी तक्रार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वास करगुटकर यांनी राजापूरच्या वनखात्याकडे केली आहे.
आंबोळगड गावामध्ये संध्याकाळच्या वेळी वस्तीमध्ये बिबट्या फिरताना दिसत असल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वास करगुटकर यांनी वनखात्याकडे कैफियत मांडली आहे. या ठिकाणी फिरणारे बिबटे गाई, वासरे, कुत्र्यांची शिकार करतात. जनार्दन जयराम करगुटकर यांच्या गाईचे वासरूसुद्धा बिबट्याने भक्ष्य केले आहे. याशिवाय गावातील अनेक कुत्रे मारले असल्याने ग्रामस्थांच्या जीवाला धोका असल्याने वनविभागाने बिबट्यांच्या खाद्याची व्यवस्था करावी, अशी मागणी तंटामुक्त अध्यक्ष विश्वास करगुटकर यांनी वनखात्याकडे केली आहे.
राजापूर शहरासह तालुक्यात सध्या बिबट्यांचा मनुष्यवस्तीतील उघड वावर ऐरणीवर आला असून, नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्यावर शहरातच बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे बिबट्यांचा संचारही उघड झाला आहे; मात्र वनखात्याचे अधिकारी तालुक्यातून येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्याने माणसांच्या जीवाची काही किंमत आहे की नाही, असा संतप्त सूर उमटत आहे.