
मालवणातील विकासनिधीबाबत नाईकांकडून जनतेची दिशाभूल
swt1328.jpg
88848
मालवणः भाजप कार्यालय येथे माहिती देताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर.
मालवणातील विकासनिधीबाबत
नाईकांकडून जनतेची दिशाभूल
चिंदरकर, केनवडेकरः भाजपकडून टीका
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : राज्यातील भाजप युती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात मोठा विकास निधी आला आहे; मात्र याचे फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक आणि त्यांचा कंपू घेत असून जनतेची दिशाभूल करत आहेत. शहर व तालुक्यात आलेल्या विकासनिधीचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांचेच आहे, असा दावा भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी केला.
येथील भाजप कार्यालय येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, मोहन वराडकर, महेश सारंग, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बबन परब, सुशील शेडगे, निकम यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चिंदरकर यांनी ज्यावेळी सत्तेत होता, तुमचे मुख्यमंत्री होते, तेव्हा विकासकामे करणे शक्य झाले नाही; मात्र आज सत्ता नसताना आणि विरोधी बाकावर असताना भाजप युती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे आपली सांगण्याचे काम आमदार नाईक व त्यांचा कंपू करत आहेत. जनतेची दिशाभूल करणे हेच आमदार नाईक यांचे काम आहे, अशी टीका केली. तर केनवडेकर यांनी ठाकरे सरकार असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा कोणताही निधी मंजूर झाला नाही, अथवा काम पूर्ण झाले नाही. त्याउलट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुमारे ४२ कोटी निधीतून मुख्यमंत्री सडक योजनेची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. आताही भाजप युती सरकार माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे होत आहेत. मोठ्या प्रमाणात विकासनिधी बंधाऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. याबाबत पालकमंत्री चव्हाण, माजी खासदार राणे यांचे विशेष प्रयत्न आहेत, असे सांगितले.