
पाणी सोडण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला रोखले
rat१४२४.txt
बातमी क्र..२४ (पान ३ साठी)
पाणी सोडण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला रोखले
राजापुरातील प्रकार ; तलावातून होणारा पाणीपुरवठा ठप्प
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १४ ः शहरातील रानतळे येथील ऐतिहासिक शिवकालीन तळ्याला लागूनच २०० मीटर परिक्षेत्रातील विंधन विहीर खोदकामाला नगर पालिका प्रशासनाने विरोध केला. यामुळे नागरिक संतापले. पाणी सोडण्यास गेलेल्या नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा घेराव घालून त्यांना पाणी सोडण्यापासून रोखले व धमकावलेही. त्यामुळे या तलावाकडून पाणीपुरवठा होणाऱ्या साखरकरवाडी व परिसरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी साखरकरवाडीतील नागरिक रक्षित साखरकर व अन्य नागरिकांनी केली.
रानतळे येथील ऐतिहासिक शिवकालीन तळ्याला पुरेसा स्त्रोत असताना व या तळ्यातून या भागातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत असताना या ठिकाणी अनधिकृत विंधन विहीर खोदकाम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा स्रोत कमी होण्याचा धोका निर्माण झाल्याने नगर पालिका प्रशासनाने तत्काळ पोलिसात तक्रार करून हे काम रोखले; मात्र यानंतर या भागातील महिला-पुरुषांनी एकत्रित येत रानतळे येथे पाणी सोडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रोखले व त्यांना घेराओ घातला. तसेच पाणी सोडण्यास मज्जाव केला. या कृत्यामुळे या तळ्यातून अन्य ठिकाणी होणारा पाणीपुरवठाही ठप्प झाला. या विरोधात रक्षित साखरकर यांच्यासह अन्य नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करून अशाप्रकारे पाणी रोखणाऱ्यांविरोधात व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी लेखी तक्रार केली आहे. शहरातील नागरिकांतूनही या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता नगर पालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
---