सिंधुरत्न योजनेतून परशुराम, मार्लेश्वरला प्रत्येकी 2 कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुरत्न योजनेतून परशुराम, मार्लेश्वरला प्रत्येकी 2 कोटी
सिंधुरत्न योजनेतून परशुराम, मार्लेश्वरला प्रत्येकी 2 कोटी

सिंधुरत्न योजनेतून परशुराम, मार्लेश्वरला प्रत्येकी 2 कोटी

sakal_logo
By

rat१५३८.txt

परशुराम, मार्लेश्वरला प्रत्येकी २ कोटी

प्रमोद जठार ; कोकणात ऊस लागवड, प्रक्रिया उद्योगही

चिपळूण, ता. १५ ः कोकणातील पर्यटनसह कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत. ऊस लागवड व त्याला अनुसरून इथेनॉलसारखे अन्य प्रकल्पही उभारले जाणार आहेत. पर्यटनवाढीसाठी ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र विकसित केले जाणार आहेत. कसबा येथे १०० एकर जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. तसेच परशुराम व मार्लेश्वर देवस्थानसाठी प्रत्येकी २ कोटीचा निधी दिला जाणार आहे, अशी माहिती सिंधुरत्न समिती सदस्य व माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जठार म्हणाले, सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन, कृषी, सहकार, मच्छीमार व विविध घटकातील व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये कोकणातील ऐतिहासिक पार्श्वभूमी तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून कसबा परिसरात १०० एकर जागा घेण्याचे नियोजन आहे. कोकणात आलेला पर्यटक थेट गोव्यात न जाता तो काही दिवस कोकण किनारपट्टीवर रमेल, अशा पद्धतीचे प्रयत्न सिंधुरत्न योजनेअंतर्गत केले जात आहेत. त्यासाठी परशुराम व मार्लेश्वर देवस्थान विकसित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले, चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्यांमध्ये फेरबदल केल्यानंतर कामाला गती मिळाली. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण नियमित पाठपुरावा करत आहेत. २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत चौपदरीकरणाचे काम मार्गी लागेल. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगरसेवक परिमल भोसले, उद्योजक प्रशांत पटवर्धन, भाऊ कानडे आदी उपस्थित होते.

साबरमतीच्या धर्तीवर वाशिष्ठीचा विकास
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात वाशिष्ठी नदीतील गाळ उपशासाठी निधीची तरतूद झाली नसली तरी केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत साडेतीन हजार कोटीचा निधी कोकणसाठी मंजूर केला आहे. या निधीतून वाशिष्ठी नदीचे दोन्ही किनारे गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर विकसित करण्याची गरज आहे. तशी मागणी आपण स्वतः करणार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या असल्याचे माजी आमदार जठार यांनी सांगितले.