रत्नागिरी- गार्‍हाणे घालून उभारणार साहित्यिक गुढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- गार्‍हाणे घालून उभारणार साहित्यिक गुढी
रत्नागिरी- गार्‍हाणे घालून उभारणार साहित्यिक गुढी

रत्नागिरी- गार्‍हाणे घालून उभारणार साहित्यिक गुढी

sakal_logo
By

गाऱ्‍हाणे घालून उभारणार साहित्यिक गुढी

जनसेवा ग्रंथालय ; साहित्य पताकांनी सजावट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : मराठी साहित्यामध्ये चैतन्य यावे, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, आणि कोकणातून नवे साहित्यिक घडावे या उद्देशाने रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे चौथ्या वर्षी साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. कोकणच्या संस्कृतीचे खास वैशिष्ठ्य असलेले संगमेश्वरी बोली भाषेतील खणखणीत गार्‍हाणे या वेळी घालण्यात येणार आहे.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी (ता. २१) सकाळी १० वाजता जनसेवा ग्रंथालयाच्या प्रांगणात ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला गुढीचे खास आकर्षण असलेल्या ‘साहित्य पताका’ लावण्यात येतील. जनसेवाचे वाचक श्रीनिवास सरपोतदार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध विषयांवर साहित्य पताका तयार केल्या जातात.
या वेळी पुस्तकांची माळ असलेली साहित्यिक गुढी मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात येईल. मान्यवर, नवोदित लेखक-कवी यांच्याहस्ते गुढीपूजा व ग्रंथपूजा होईल. गुढीपुजा झाल्यानंतर कोकणातील साहित्य चळवळीला उर्जितावस्था लाभावी, नवनवे साहित्यिक निर्माण होवून सकस साहित्य निर्मिती व्हावी, या उद्देशाने संगमेश्वरी बोली भाषेतील लेखक अमोल पालये हे खणखणीत गार्‍हाणे घालतील. त्यानंतर मराठी साहित्याचा पाया रचणार्‍या संत साहित्याच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
कोकणच्या साहित्य निर्मितीला आलेली मरगळ दूर होवून सकस साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे. साहित्य विश्वातील हा एकमेव आणि आगळा-वेगळा असा उपक्रम आहे. या कार्यक्रमाला नवोदित लेखक, वाचक, साहित्यिक, सभासद, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाने केले आहे.

शालिवाहन शक’
शालिवाहनाच्या पराक्रमाच्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहनाच्या नावाने नवीन कालगणना चैत्र शुद्ध प्रतिप्रदेला शालिवाहन शक अशी सुरू करण्यात आली. ज्याने विजय मिळवला तो शालिवाहन आणि ज्यांच्यावर विजय मिळवला ते शक अशा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ या संज्ञेमध्ये झाला आहे. यानिमित्त अवघ्या महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. मराठी साहित्य विश्वात नव्याची निर्मिती व्हावी अर्थात वाचन आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी नेहमीच कटीबद्ध असलेल्या जनसेवा ग्रंथालयातर्फे ही साहित्यिक गुढी उभारण्यात येणार आहे.