
समायोजनासाठी सकारात्मकतेची गरज
90068
कुडाळ ः बॅ. नाथ पै नर्सिंग महिला महाविद्यालय आयोजित कार्यक्रमात बोलताना सुस्मिता राणे. सोबत मीना जोशी, कल्पना भंडारी व इतर.
समायोजनासाठी सकारात्मकतेची गरज
सुस्मिता राणे; कुडाळ नर्सिंग महाविद्यालयात व्याख्यान
कुडाळ, ता. १९ ः गोड वाणीने जगत मित्र होता येते. प्रेमाने अनेकांना आपलेसे करता येते. त्यासाठी महिलांनी आयुष्यात योग्य समायोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सकारात्मक विचार जोपासावेत, असे विचार नारीशक्ती समिती सिंधुदुर्गच्या सदस्या ज्येष्ठ समाजसेविका तुळसुली हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका सुस्मिता राणे यांनी मांडले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे बहि:शाल शिक्षण मंडळाच्या विद्यमाने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन त्या बोलत होत्या.
सौ. राणे म्हणाल्या, ‘‘आजची बदलती जीवनशैली, ताणतणाव, कुटुंबाची जबाबदारी आणि आयुष्यातील अनेक स्थित्यंतरे आदी जबाबदाऱ्या एक स्त्री म्हणून पार पाडाव्या लागतात. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे स्त्रियांचा स्वतःप्रती आणि समाजाप्रती असणारा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. स्त्री ही सृजनशील आहे. नवनिर्मिती हे त्यांचे मूळ आहे. म्हणूनच ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’, असे म्हटले जाते. समाजातील सर्व स्त्री वर्गाला प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारही अनेक योजनांची अंमलबजावणी करते. याविषयी स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण होणे महत्त्वाचे आहे. कुटुंबाचा मिळणारा पाठिंबा आणि समाजामध्ये असलेले स्त्रीचे स्थान या सर्व गोष्टी तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करतात. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि पर्यायाने समाज पुढे जातो, ही एक साखळी आहे आणि ती जर सातत्याने सुरू राहायला हवी, तर महिलांनीही प्रत्येक क्षेत्रांत हिरहिरीने सहभाग घेणे महत्त्वाचे आहे.’’ यावेळी व्यासपीठावर बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या मीना जोशी, उपप्राचार्या कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर, शांभवी आजगावकर-मार्गी, प्रणाली मयेकर, सुमन करंगले-सावंत, प्रियांका माळकर, रेश्मा कोचरेकर, गौतमी माईणकर, ऋग्वेदा राऊळ, कृतिका यादव, वैजयंती नर उपस्थित होत्या. प्रा. श्रीमती वैजयंती नर यांनी सूत्रसंचालन केले. प्रणाली मयेकर यांनी आभार मानले.