
खेड-दापोली मतदारसंघातील भगवा उतरणार नाही
दापोली मतदारसंघातील भगवा उतरणार नाही
आमदार योगेश कदम ; भास्कर जाधवांना निवडून येण्याचे दिले आव्हान
खेड, ता. १९ ः गोळीबार मैदानातील या सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाने विरोधकांना उत्तर दिले आहे. आज मी आमदार म्हणून शब्द देतो की दापोली मतदारसंघातील भगवा उतरणार नाही, तशी हिंमत कोणात नाही, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.
खेड येथील गोळीबार मैदानातील सभेत बोलताना ते म्हणाले,''उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी अडीच वर्षात काय केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे कोकणाची अपेक्षा वाढली आहे. सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्रामपंचायत निवडणुकीत ४७ पैकी ३७ आम्ही मिळवल्या. तीन वर्षे घरी बसलेले आज बाहेर पडले, तेही खेडमध्ये सभा घेण्यासाठी. कोकणात कुणबी समाज मोठा आहे. त्यांना न्याय द्यायाचे काम मुख्यमंत्री शिंदे करणार आहेत. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्ही भाजपमध्ये जाणार अशी आवई उठवली जात होती. भाजप हा पक्ष वाईट नाही. पण आमची बदनामी केली जात होती. पन्नास खोके या व्यतिरिक्त ते काहीच बोलत नाहीत. जेव्हा खेड पाण्याखाली होते, तेव्हा मुख्यमंत्री लोकांचे अश्रू पुसायला आले नाहीत. पण एकनाथ शिंदे आपण आलात, तत्काळ दोन कोटी दिलेत. आदित्य ठाकरे आले, चार पावलेही चालले नाहीत. पण आपण खेड शहर फिरलात. निसर्ग चक्रीवादळातील अनेक कुटुंब आजही उदध्वस्त आहेत. त्यावेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते, पण अश्रू पुसायला आले नाहीत. तेव्हा एकनाथ शिंदे आले, असे सांगतानाच आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघात निवडून येऊन दाखवावे असे आव्हान आमदार योगेश कदम यांनी दिले.
चौकट
दोन नाही पाचही आमदार आमचेच ः उदय सामंत
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘या सभेने सिद्ध केले की पुढील आमदार योगेश कदमच असेल. ती कॉर्नर सभा होती. अशा सभा घ्यायची आमच्यावर टीका करायची. ती सभा विचार देणारी नव्हती तर शिवीगाळ करणारी होती. कोकणाने पुन्हा ठरवले आहे की शिंदे यांच्या मागे राहायचे. योगेश यांना राजकीयदृष्ट्या कसे संपवायचे, याचे षडयंत्र रचले तेव्हा मी तिथे होतो. या मतदारसंघात राष्ट्रवादी वाढवायची हे तेव्हा ठरले होते. तेव्हा माझ्याबद्दल योगेश यांचा गैरसमज झाला होता. भविष्यात दोनच नाही पाचही आमदार तुमचे असतील असा शब्द देतो असा विश्वास दिला.