
खेड-उत्तर सभेने शिवसैनिकाना मिळाले उत्तर
-rat21p17.jpg- KOP23L90491 खेड ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
---------
उत्तर सभेने शिवसैनिकांना मिळाले उत्तर
कोकण ढवळून निघाले ; मेळाव्याने शिवसैनिकांची मनगटे चेतवली
सिद्धेश परशेट्ये ःसकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २० : एकाच महिन्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या येथील गोळीबार मैदान येथील विराट सभा या कोकणातील राजकारणाच्या दिशा ठरवणाऱ्या ठरल्या आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा झालेला पक्षप्रवेश, त्या पक्षप्रवेशादरम्यान ठाकरे यांची उपस्थिती, त्यांनी या सभेच्या निमित्ताने उपस्थित जनतेला केलेले भावनिक आवाहन आणि प्रत्युत्तर नाही नाही म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांचा घेतलेला समाचार यामुळे वातावरण दोन्हीकडून तापले आहे.
सभेत ठाकरे यांनी गद्दारीचा मुद्दा लावून धरत, आगामी निवडणुकीत यांना संपवा, असे आवाहन केले. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याच ठिकाणी ‘उत्तर सभा’ होईल, असं जाहीर केले. तसा कोकण हा सुरवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामध्ये शिवसेनेचा झंझावात पुन्हा व्हावा, म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी या ठिकाणी हजेरी लावली. अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून कदम पिता-पुत्रांनी ही सभा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सभेला मैदानात आणि भवतालीही सर्वत्र लोकांची दाटी झाली होती.
वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यात वेळ दवडायला नकोच होता. कारण कोकणी माणसाने ही सभा केव्हाच जिंकली होती. कोकणी माणूस हा भावनिक आहे. मुख्यमंत्री आपल्या दारी आलेत याचेच त्याला विशेष अप्रुप होते. शिंदे यांच्या भाषणाने कोकणी माणूस विसावला गेला. शिवसेनेतील अंतर्गत कलहावर रामदास कदम यांनी आसुड ओढले होतेच. कदम यांचा हा आक्रमकपणा उपस्थितांना विशेष भावला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी विचार मांडलेल्या सर्वच नेत्यांनी केलेल्या भाषणामुळे शिवसैनिकांची मने चेतवू लागली होतीच. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी आपल्या बोलण्यात कोकणच्या विकासावर जास्त भर दिला. त्यामुळे गेले नऊ महिने संभ्रमावस्थेत असलेल्या शिवसैनिकाला आपला मार्ग दिसला. शिवसैनिकांना अपेक्षित असलेला सुर रविवारच्या या सभेमूळे सापडला आहे. आता या चेतवलेल्या मनातून निष्ठावंताच्या शिवसेनेला कितपत यश मिळेल हे पहाणे औसुक्याचे ठरेल.
--------------
चौकट
शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक
मेळाव्याला न भुतो न भविष्य अशी गर्दी पाहायला मिळाली. आजही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे. शिवसैनिकांना कॉग्रेस- राष्ट्रवादी सोबत असलेली आघाडी मान्य नाही. त्याला भाजप - सेना ही नैसर्गिक युतीच हवी आहे. आम्ही सत्तेसाठी नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी एकत्र आलो आहोत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामदासभाई आणि सहकार्यासह आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे यापुढे प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिक आम्हाला साथ देईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी दिली.