
खरारी नदीपात्रातील गाळ उपसा
90572
दोडामार्ग ः नदीतील गाळ काढण्यासंदर्भात रोहित कोरे यांना संदेश राणे व अलविंद लोबो यांनी निवेदन दिले. (छायाचित्र ः संदेश देसाई)
खरारी नदीपात्रातील गाळ उपसा
युवासेनेची मागणी; प्रशासनास निवेदन
दोडामार्ग, ता. २१ ः खरारी नदीपात्रात साचणाऱ्या गाळामुळे पावसाळ्यात पाणी शेतीत शिरून शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी यावर्षीही वीजघर, बांबर्डे, मुळस आदी ठिकाणी नदीतील गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा, अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख संदेश राणे व कोनाळ विभाग प्रमुख अलविंद लोबो यांनी तिलारी पाठबंधारे अभियंता रोहित कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, अतिपर्जन्यवृष्टीमुळे डोंगरमाथ्यावरील गाळ पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीपात्रात येऊन स्थिरावतो. परिणामी, गाळ साचल्याने नदीपात्र अरुंद होते. नदीला भरमसाट येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन हे पाणी नदीलगत असलेल्या शेत बागायतीत घुसते. त्याचा परिणाम पिकांवर होतो. यावर्षी देखील खरारी नदीपात्रात वीजघर, बांबर्डे, मुळस येथे भरमसाट गाळ साचला आहे. हा गाळ पावसाळ्यापूर्वी काढणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत नदीतील गाळ काढून पाण्याचा प्रवाह पूर्वस्थितीत करावा. जेणेकरून पावसाळ्यात नदीतील पाणी शेतीत येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. या आशयाचे निवेदन उद्धव ठाकरे युवासेना तालुकाप्रमुख संदेश राणे, कोनाळ विभाग प्रमुख अलविंद लोबो यांनी तिलारी पाठबंधारे अभियंता कोरे यांना दिले.