वीजबिलांसाठी शाळांचा सादिल खर्च वाढवा

वीजबिलांसाठी शाळांचा सादिल खर्च वाढवा

वीजबिलांसाठी शाळांचा सादिल खर्च वाढवा

कुडकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे ः तालुक्यात नसलेल्या बँकेत खाते उघडण्याचा आदेश मागे घ्यावा
राजापूर, ता. २४ ः जिल्हा परिषद शाळांचा विद्युत बिलांचा पश्न निकाली निघण्यासाठी शाळांच्या सादिल खर्चामध्ये वाढ करावी. तसेच तालुक्यात नसलेल्या बँकांमध्ये खाते उघडण्याचे आदेश काढलेले आदेश शिक्षण विभागाने थांबवावेत, अशी मागणी चिखलगावचे माजी सरपंच तुकाराम कुडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे ग्रामस्थ व शिक्षकांची ससेहोलपट होत असून ती थांबवावी अशी मागणी केली आहे.
जिल्हा परिषद शाळांमधून मुलांना शिक्षण घेण्यासाठी टी.व्ही, लॅपटॉपचा वापर केला जातो. त्यामुळे महिन्याचे बिल अधिक येते. बिल भरणा करण्यासाठी शाळांकडे उत्पन्न नाही. बिल कोणत्या खर्चातून भरावे. शाळा शहरात आहेत, तेथे नगरपालिका विद्युत बिले भरणा करते. कोकण दुर्गम भाग असल्यामुळे ग्रामपंचायत ग्रामनिधीतून सुद्धा बिले भरणा करू शकत नाहीत. त्यांचे घरपट्टी शिवाय उत्पन्न नाही. शासन १ ते ४ थी पर्यंत शाळांना सादिल खर्च म्हणून ४ टक्के तर आठवीपर्यंतच्या शाळांना ८ टक्के रक्कम देते. होणारा खर्च पाहता ती रक्कम अपुरीच आहे. त्यामुळे विजेची बिले भरणा करण्याचा शिक्षकांसमोर दर महिन्याला पश्न उभा राहतो. शाळेतील मुलांना शासनाकडून जेवण, कपडे, पुस्तके, दप्तर दिले जाते तर अभ्यास करायला प्रकाश लागतो, त्याचा विचार केला जात नाही. याकरीता प्रत्येक शाळांना सादिल खर्च 10 टक्के व शालेय खर्च 20 टक्के देण्यात यावा अशी मागणी कुडकर यांनी केली आहे.
जि. प. शाळांचा व्यवहार चालविण्यासाठी बँक खाते काढावे लागते. पूर्वी राजापूर तालुक्यातील शाळांचे बॅंक व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक या बँकांतून चालत होता. या बँकामधील खाती बंद करून एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात यावीत असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांची धावपळ सुरू झाली. राजापूर तालुक्याचा विचार करता एचडीएफसी बँक राजापूर तालुक्यात नाही. येथील शिक्षक व ग्रामस्थांना लांजा तालुक्यात धाव घ्यावी लागते. यामध्ये वेळ व खर्चाचा अपव्यय होतो. त्यामुळे अनेक शाळांमधील विद्यार्थाची बँक खातीच काढण्यात आलेली नाहीत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांना कुडकर यांनी ही निवेदन पाठविली आहेत.

चौकट
मुले गणवेशापासून वंचित
बॅंक खाते न काढल्यामुळे काही मुलांच्या गणवेशाचे पैसे परत गेले. त्यामुळे अनेक सर्वसामान्य मुलांची गैरसोय झाली आहे. हा गोंधळ विशिष्ठ बॅंकेत खाते काढण्याचा आदेशामुळे झाला आहे. असे आदेश रद्द करावा आणि ज्या विद्यार्थ्याना गणवेश मिळाला नाही, त्यांना दिला जावा अशी मागणीही निवेदनामार्फत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com