
‘तिलारी’चे पाणी ‘माटणे’ला मिळणार
‘तिलारी’चे पाणी ‘माटणे’ला मिळणार
लाभक्षेत्रात समावेशासाठी सर्व्हे; पंचक्रोशीतील एकत्रीत लढ्याला सकारात्मक प्रतिसाद
दोडामार्ग, ता. २५ ः तिलारी प्रकल्पाचे पाणी माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. ही गावे तिलारीच्या लाभक्षेत्रात आणण्यासाठीच्या सर्वेला गती आली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी या भागातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येत उभारलेल्या लढ्याला लवकरच यश येईल, असे आज या लढ्यातील लोकप्रतिनिधींतर्फे माजी पंचायतसमिती उपसभापती लक्ष्मण नाईक यांनी सांगितले.
श्री. नाईक यांनी माटणे जिल्हा परीषद मतदारसंघातील सर्व सरपंच आणि उपसरपंचांना एकत्र घेत मतदारसंघातील खोक्रल, उसप, पिकुळे, झरेबांबर, आयनोडे, सरगवे, पाल पुनर्वसन, आंबेली, वझरे, आंबडगाव, माटणे, आयी, तळेखोल व विर्डी या गावांना तिलारी धरणाचे पाणी मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना लवकरच मुर्त स्वरुप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही गावे तिलारी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राबाहेर असल्याने प्रथमत: ती लाभक्षेत्रात आणणे गरजेचे होते. याबाबत शासन पातळीवर प्रयत्न करत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यांनी या बाबींची दखल घेत ही गावे लाभक्षेत्रात आणण्याच्या दृष्टीने तातडीने सर्वेच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. केवळ सुचना न करता रत्नसिंधु योजनेच्या माध्यमातुन सर्वेसाठी आवश्यक निधीची तरतुदही केली. त्यामुळे तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून वरील गावांतील आवश्यक सर्वेला सुरुवात करण्यात आली. परिणामी या गावातील सर्व सरपंच, उपसरपंचांच्या लढ्यास युती सरकारच्या माध्यमातुन मुर्त स्वरुप येण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. या कामी शिक्षणमंत्री दीपक केसरकर व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचेही महत्वपुर्ण सहकार्य लाभल्याचे श्री. नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.