
-महावितरणची 1 कोटी 39 लाखाची वसुली
महावितरणची सव्वा कोटींहून अधिकची वसुली
राजापूर उपविभाग ; ५३ लाखाची वसुली बाकी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः महावितरणकडून मागील थकीत आणि चालूवर्षीची वसुली करण्याची धावपळ सुरू आहे. राजापूर उपविभागाने एक कोटी ९२ लाखाच्या वसुलीपैकी १ कोटी ३९ लाखाची वसुली करण्यात यश मिळवले आहे. थकीत वसुलीची रक्कम भरणा करण्याकडे शासकीय कार्यालयांनी महावितरणकडे पाठ फिरवली आहे.
थकीत असलेल्या वसुलीसाठी महावितरणकडून उपकार्यकारी अभियंता अनिलकुमारे डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धडक मोहिम राबविली आहे. राजापूर उपविभागाने १ कोटी ३९ लाखाची वसुली केली आहे. अद्याप ५३ लाखाची वसुली बाकी आहे. मार्च एंडिंग असल्याने पुढील पाच दिवसात लाखो रुपयांची थकीत रक्कम वसुलीचे आव्हान महावितरणसमोर आहे.
-
थकीत असलेली विभागनिहाय रक्कम
शेतीपंप (फळबाग) ः २८ ग्राहक ः ७ लाख ९४ हजार ४२३ रुपये
पथदीप ः ६ ग्रामपंचायती ः ४१ हजार १११ रुपये
शेतीपंप ः २३ ग्राहक ः ७७ हजार ४५६ रुपये
घरगुती-औद्योगिक-व्यवसायिक ः २६६ ग्राहक ः ५ लाख ८२ हजार ३०४ रुपये
पब्लिक सर्व्हिसेस ः ४६ ग्राहक ः २ लाख ९१ हजार ३७१ रुपये
-
शासकीय कार्यालयाची वीज कापणार का?
सर्व शासकीय कार्यालयांकडून विविध करांची वसुली करण्याची धडक मोहिम राबविली जाते. मात्र अनेक कार्यालयांनीच महावितरणचे बील भरलेले नाही. सर्वसामान्य ग्राहकांची वीजबिल थकीत राहील्याने वीजवितरण विभागाकडून थेट कनेक्शन कापण्याची कारवाई केली जाते. त्यामुळे वीजबिल भरण्यास ठेंगा दाखविणाऱ्या शासकीय कार्यालयांची थकीत वसुली करण्यासाठी महावितरण वीज तोडण्याची कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.