
सावंतवाडीत पुन्हा रामराज्य आणणार
91613
सावंतवाडी ः आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू लोंढे यांना देऊन सन्मानित करताना गोवा मांद्रे आमदार जीत आरोलकर. बाजूला मंत्री दीपक केसरकर व अन्य.
सावंतवाडीत पुन्हा रामराज्य आणू
मंत्री दीपक केसरकर; पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी रामराज्य असे संबोधलेल्या सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा रामराज्य आणायचे आहे. त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे. राज्याचा मंत्री असलो तरी आकाशात फिरणाऱ्या घारीप्रमाणे माझी नजर सावंतवाडी मतदारसंघावर आहे. येथील विकासाचा ध्यास मी घेतला आहे. त्या दृष्टीने मी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडीचे सुपुत्र दीपक केसरकर यांनी येथे बोलताना सांगितले. आपले वय आता घेण्याचे नव्हे तर देण्याचे आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण आणि रौप्य महोत्सवी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गोव्याचे आमदार जीत आरोलकर, मुंबई मनपाचे माजी नगरसेवक शैलेश परब, पत्रकार शेखर सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले की, ‘‘मुंबई मनपामध्ये मुलांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच सोयी नव्याने राज्य शासन शिक्षणामध्ये आणत असल्याचे श्री. परब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. प्रथमच पत्रकारांच्या कार्यक्रमास येण्याचे भाग्य मला मिळाले. येथील पत्रकारिता अत्यंत चोखंदळ आणि प्रामाणिक आहे. गेली पंधरा वर्षे या विधानसभा मतदारसंघात काम करत असताना सकारात्मक पत्रकारिता दिसून आली.’’
श्री. आरोलकर म्हणाले, ‘‘गोव्याच्या सीमेवर तूये येथे येत्या महिनाभरात गोवा बांबुळीच्या धर्तीवर सुसज्ज असे हॉस्पिटल, त्याचबरोबर पुढील सहा महीन्यात धारगळ येथे आयुषचे मोठे संशोधन केंद्र होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा प्रश्न निश्चितच सुटेल, त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कायम सकारात्मक आहोत. मी गोव्याचा असलो तरी सिंधुदुर्ग आणि गोव्याचे नातेसंबंध जोडलेले आहेत. आम्ही कायमच येथील लोकांना सहकार्य करतो. त्यामुळे कधीही हक्काने हाक मारा, मी निश्चितच मदत करेन.’’
येथील पत्रकारांनी समाजाला कायम आदर्श घालून दिला आहे. त्यांची पत्रकारिता सकारात्मक आहे. त्यामुळे आम्हाला काम करताना निश्चितच प्रेरणा मिळते, असे मत भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले. चांगल्याला चांगले म्हणणे ही केसरकारांची सवय मला आवडते. भविष्यात त्यांनी कुडाळात मध्यवर्ती ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी आवाहन केले.
पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा श्री. केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक गावस, माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू लोंढे, चंदू वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार लुमा जाधव, जीवनगौरव पुरस्कार देऊन रमेश बोंद्रे, परशुराम मांजरेकर यांना स्व. त्रि. अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गणेश हरमलकर यांचा ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार (कै.) मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी २५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात गजानन नाईक, रमेश बोंद्रे, वसंत उर्फ अण्णा केसरकर, मोहन जाधव, अवधूत पोईपकर, अनिल भिसे, सुरेश गवस, महादेव परांजपे, राजेश मोंडकर, हरिश्चंद्र पवार, प्रवीण मांजरेकर, विजय देसाई, राजू तावडे, संतोष सावंत, लोंढे, शिवप्रसाद देसाई, हर्षवर्धन धारणकर, उत्तम नाईक, बबन उर्फ लक्ष्मण गवस, उमेश सावंत, आशुतोष भांगले, विजय राऊत ,मंगल कामत ,विष्णू चव्हाण आदींना गौरविण्यात आले.
--
जिल्ह्याचे वैभव वाढविण्याचे प्रयत्न
श्री. केसरकर पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५०० विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत शिक्षण देणारी शाळा उभारण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण सोसावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिंधुदुर्गसारखा जिल्हा महाराष्ट्रात नाही. पर्यटनासह इतर सर्वच दृष्टीने विकसित असा आपला जिल्हा आहे. त्याचे वैभव आणखीन वाढविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जातील. आता यापुढे मी टीका करणाऱ्यांकडे लक्ष देणार नाही. बोलणाऱ्यांना बोलायला दिले पाहिजे. आपण फक्त काम करत राहिले पाहिजे.’’