
ःराजापुरात सापडले 181 क्षयरोग रुग्ण
राजापुरात सापडले १८१ क्षयरोग रुग्ण
आरोग्य विभागाचे सर्व्हेक्षण ; निक्षय मित्रांनी दिला मदतीचा हात
राजापूर, ता. २७ ः पंचायत समितीच्या आरोग्य विभागातर्फे तालुक्यामध्ये ‘क्षयरोग मुक्त भारत अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये तब्बल १८१ क्षयरोग रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २९ रुग्ण सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत गावांमध्ये सापडले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
सर्व्हेक्षणामध्ये १८१ क्षयरोग रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण सोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये तर सर्वाधिक कमी म्हणजे ११ रुग्ण जवळथेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आढळले आहेत. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. क्षयरोग रुग्ण लवकर बरा होण्यासाठी त्याला सकस आणि पौष्टिक आहार मिळणे गरजेचे असते. यासाठी येणाऱ्या खर्चाचा भार उचलण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. २३ अक्षय निक्षय मित्रांनी क्षयरोग रुग्णांच्या खर्चाचा भार उचलून सामाजिक बांधिलकी जोपासली.