
कृषी व्यवसायातून उद्योगास चालना
91907
झाराप ः प्रगतशील शेतकरी शरद धुरी यांचा सत्कार करताना कुडाळ तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर, बाजीराव झेंडे, विष्णू तामाणेकर, अमोल करंदीकर, डॉ. विलास सावंत आदी.
कृषी व्यवसायातून उद्योगास चालना
अश्विनी घाटकर; झाराप येथे शेतीशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा विकास करणे हाच राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा प्रमुख उद्देश आहे. कृषी व्यवसायातून उद्योजकतेला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन कुडाळ तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर यांनी झाराप येथे शेतीशाळेत केले.
कृषी व्यवसाय उद्योजकतेला राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत भातशेती व गुणवत्ता सुधार प्रकल्प आणि अंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, शेतकरी प्रशिक्षण-जागृती कार्यक्रम झाराप येथे प्रगतशील शेतकरी शरद धुरी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरपंच दक्षता मेस्त्री, उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य संजीवनी पेंडूरकर, अनंत मयेकर, अॅग्रिकार्ट फार्म प्रोड्युसर कंपनीचे सचिन चोरगे, प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे, विष्णू तामाणेकर, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास सावंत, मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर, जयश्री तेली, साईनाथ तांबोळी, कृषी साहायक गीता परब आदींसह राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सर्व गटाचे शेतकरी उपस्थित होते.
यावेळी घाटकर यांनी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये, अंमलबजावणी या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. सावंत यांनी शेतीतील देशी गायीचे महत्त्व, सेंद्रिय शेती, पाणी साठवण या विषयी मार्गदर्शन केले. ॲग्रिकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे चोरगे यांनी स्थानिक जैवविविधता, बियाणे संकलन, बियाणे बॅंक, पीक वाण, बिजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, प्रशिक्षण या विषयी मार्गदर्शन केले. शेतीत यंत्रिकीकरणाचे महत्त्व याबाबत विष्णू तामणेकर, शरद धुरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी शरद धुरी यांचा कृषी विभागातर्फे सत्कार करण्यात आला. गटातील शेतकऱ्यांनी शेतीत येणाऱ्या समस्यांच्या निवारणाबाबत मार्गदर्शन घेतले. शरद धुरी यांच्या शेतात यंत्राद्वारे भात लावणी प्रात्यक्षिक दाखविण्यात
आले. अमोल करंदीकर यांनी आभार मानले.
--
कृषी पायाभूत सुविधाही
श्रीमती घाटकर म्हणाल्या, ‘‘कृषी व्यवसायातून उद्योजकतेला चालना दिली जाईल. या योजनेतून कृषी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ज्याद्वारे दर्जेदार बियाणे साठवणूक, बाजारपेठ सुविधा इत्यादींमध्ये प्रवेश निश्चित केला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योजना तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. ही योजना कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्रभावी ठरेल. योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.’’