
गुहागर ः विजापूर महामार्गाच्या अर्धवट सुरवात
फोटो ओळी
-rat२८p३०.jpg ः KOP२३L९१९४५ गुहागर-विजापूर महामार्ग
------------
विजापूर महामार्गाचे अर्धवट काम १ एप्रिलपासून सुरू
डॉ. विनय नातू ; अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा शब्द
गुहागर, ता. २८ ः गुहागर-विजापूर महामार्गाचे काम रामपूरपर्यंत झाले आहे; मात्र यामध्ये अर्धवट असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चिपळूणचे उपअभियंता यांनी दिले आहे, अशी माहिती माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी ''सकाळ''ला दिली.
फेब्रुवारी महिन्यात खासदार सुनील तटकरेंनी गुहागरमध्ये महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी गुहागर शहरातील शून्य किमीपासून शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना प्रांत प्रवीण पवार यांना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे रत्नागिरीत झालेल्या दिशाच्या बैठकीमध्येही महामार्गाच्या अर्धवट कामाबाबत चर्चा झाली. खासदार तटकरेंनी केलेल्या सूचनेप्रमाणे प्रांत पवार यांनी गुहागरमध्ये बैठक घेतली. शून्य किमीपासून विश्रामगृहापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणात किती जागा जातात याची माहिती दिली. या मार्गावरील मालमत्ताधारकांना जागा रिकामा करण्यासाठी १० मे पर्यंतची मुदत दिली. हा बैठकीच्या यशस्वीतेनंतर ठेकेदाराने कामाला सुरवात करणे अपेक्षित होते; मात्र तसे घडले नाही. अखेर डॉ. विनय नातू यांनीही पाठपुरावा सुरू केला. या संदर्भात डॉ. नातूंनी पत्रव्यवहार केल्यानंतर सोमवारी (ता. २७) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चिपळूणचे उपअभियंता यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीला ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये चिखली व शृंगारतळीतील पुलांचे काम, मार्गताम्हाणे व काजळी येथील अर्धवट काम, मोडकाआगर पुलाला जोडणारा रस्ता, गुहागरमधील महामार्गाचे कामबाबत चर्चा झाली. १ एप्रिलपासून गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील जलवाहिन्यांच्या कामाला सुरवात होईल. जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला सुरवात होईल, असे सांगितले. चिखली व शृंगारतळीतील नव्या पुलाचे बांधकामही ठेकेदार १ एप्रिलपासून करणार आहे. याच दरम्यान काजळीतील अर्धवट रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ही कामे पूर्ण होतानाच मार्गताम्हाणे बाजारपेठ व गुहागर बाजारपेठ नाक्यातील कामे हाती घेतली जातील, अशी माहिती ठेकेदाराने दिली असल्याचे डॉ. नातू यांनी सांगितले आहे.