आदर्श विद्यार्थी हाच शिक्षकांचा पुरस्कार

आदर्श विद्यार्थी हाच शिक्षकांचा पुरस्कार

91948
सिंधुदुर्गनगरी ः पुरस्कार वितरण शिक्षकांसमवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस आदी.

आदर्श विद्यार्थी हाच पुरस्कार

संजय कापडणीस; सिंधुदुर्गनगरीत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः पूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन होता, तो आता तसा राहिला नाही. हा बदल का झाला, याबाबत शिक्षकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांची आठवण कायम राहणे हाच त्यांच्यासाठी खरा पुरस्कार आहे. जेव्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरेल, असे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी आज आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा येथील सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकरी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, गटशिक्षणाधिकारी, शिक्षक संघटना पदाधिकारी, पुरस्कार प्राप्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दिरंगाईने होत असल्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. पुढील वर्षी पुरस्कार वितरणाला दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नंदन घोगळे, श्रीमती स्नेहलता राणे तसेच जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
--
विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आठवण जपावी
कापडणीस म्हणाले, ‘‘विद्यार्थांना आदर्शवत घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा सत्कार केला जात आहे. पूर्वी पुरस्कार प्राप्त शिक्षकाला समाजात एक विशिष्ट मान सन्मान होता, आता तो हळूहळू कमी होत आहे. त्यामागची कारणे काय आहेत, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन होता, तो आता तसा राहिला नाही. यात बदल झाला आहे. याबाबत शिक्षकांनी आत्मपरीक्षण करावे. जेव्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरेल. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आठवण कायम जपून ठेवणे, हाच त्यांच्यासाठी खरा पुरस्कार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com