
खेड ःखेडमधील धनगरवाड्यांना रस्त्यांची प्रतीक्षा
खेडमधील धनगरवाड्यांना रस्त्यांची प्रतीक्षा
मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष ; अन्यथा लोकवर्गणीतून कच्चे रस्ते करणार
खेड, ता. ३१ ः तालुक्यातील अनेक धनगरवाड्यांमध्ये रस्त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थांना ७५ वर्षानंतरही शासनदरबारी संघर्ष करावा लागत आहे. शासनाचे धनगरवाड्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ही बाब शासनाने गंभीरपणे न घेतल्यास धनगरवाड्यांतील कच्चे रस्ते लोकवर्गणीतून तयार करण्याचा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे.
तालुक्यातील धनगरवाड्यांच्या विकासासाठी अनेक सामाजिक मंडळे शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. धनगरवाड्यांतील रस्त्यांसाठी शासनदरबारी खेटे घालूनही पदरी मात्र निराशाच पडत आहे. धनगर समाजाला कोणी वालीचे नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. हा समाज गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करत आहे. शासन धनगरवाड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने धनगरवाड्यांचा विकास खुंटला आहे. तालुक्यातील धनगरवाड्यांतील कच्चे रस्ते लोकवर्गणीतून करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तालुक्यातील मौजे जैतापूर-धनगरवाडीतील रस्त्याची दखलच शासनाने न घेतल्याने अखेर स्थानिक ग्रामस्थांना लोकवर्गणीतून कच्चा रस्ता तयार करावा लागला. अन्य धनगर वाड्यांतील कच्चे रस्तेही लोकवर्गणीतून करण्याची वेळ आणू देऊ नका, असेही सूचित केले आहे.