
कोंडगावमध्ये लोटला आंबेडकरी संघटनांचा जनसागर.
rat15p14.jpg
96114
साखरपाः अकरा गावची एकी दाखवणारी कोंडगावची धम्म फेरी.
कोंडगावमध्ये धम्म फेरी ठरली लक्षवेधी
अकरा गावची एकी; जयघोषाने परिसर आंबेडकरमय
साखरपा, ता. १५ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावमध्ये अकरा गावांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. गेली अनेक वर्षे आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. डीजे गजर, जय भीमचा नारा आणि शांतीचा संदेश देत कोंडगाव तिठ्यावरून निघालेल्या धम्म फेरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सुमारे तीन ते चार तास चाललेली फेरी शांततेचे प्रतीक, अकरा गावची एकी, बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष, तमाम आंबेडकरी अनुयायी यांच्या जयघोषाने कोंडगाव परिसर आंबेडकरमय होऊन दुमदुमून गेला.
या वेळी तरुण-तरुणी आणि असंख्य महिला आपल्या लाडक्या दैवताला अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित होत्या. भारतीय राज्यघटनेचा आणि संपूर्ण देशाच्या परिवर्तनाचा धगधगता निखारा आज इतकी वर्षे झाली तरी प्रत्येकाच्या हृदयाच्या सिंहासनावर ठाण मांडून आहे. समाजातील महिलांना आंबेडकरांमुळे ताठ मानेने जगता आले. अनेक संकटे झेलून समस्यांचा सामना केला. डॅा. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर आज देश चालवत असून त्यांचाच वसा घेऊन अकरा गावातील अनुयायांनी शांतीचा संदेश देत समाजापुढे आदर्श ठेवला.
कोंडगाव तिठ्यापासून चाललेली धम्म फेरी कोंडगाव बाजारपेठमार्गे आंबेडकर भवनपर्यंत नेण्यात आली. पावसाच्या थेंबाथेंबाने धरणीमाता सुगंधित होऊन प्रफुल्लित होते. त्याप्रमाणे बाबासाहेबांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या रूपाने देश आनंदित होणे हे प्रत्येक भारतीयांचे भाग्यच आहे, असे प्रतिपादन रमाकांत पाटेकर यांनी केले. कोंडगावसह साखरपा, भडकंबा, भोवडे, किरबेट, देवडे, मुर्शी, दक्खन, पुर्ये मोर्डे वांझोळे या अकरा गावातील अनुयायी एकत्र येऊन जयंती उत्सव साजरा केला. या वेळी समाजातील गुणवंत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला गेला. या वेळी अकरा गावचे अध्यक्ष, पदाधिकारी, भीमसैनिक, समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते.