उमराठ शेतकर्‍यांनी घेतले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण

उमराठ शेतकर्‍यांनी घेतले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण

rat२८p१९.jpg-
९९११८
दापोली ः उमराठ येथील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
------------
उमराठ शेतकऱ्यांनी घेतले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण
कोकण कृषी विद्यापीठात; ६० शेतकऱ्यांचा सहभाग
गुहागर, ता. २८ः सेंद्रिय शेतीकडे वळणे ही खरी काळाची गरज आहे. गुहागर तालुक्यातील उमराठच्या शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन प्रशिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर हे आग्रही आणि प्रयत्नशील होते. त्यानुसार दापोली कृषी विद्यापीठ येथील सेंद्रिय शेती प्रकल्पातील प्रशिक्षण हॉल येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले.
हे परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेतीविषयक मार्गदर्शन प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी, गुहागर आणि सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यावतीने हे प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणात उमराठमधील सुमारे ६० पुरुष आणि महिला शेतकऱ्यांनी अतिशय उत्साहात भाग घेतला होता.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनासाठी कृषी विद्या विभागाचे प्रकल्पप्रमुख डॉ. प्रशांत बोडके, कृषी विद्या विभागाचे सहप्रकल्प प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक डॉ. वैभव राजेमहाडीक, विस्तार शिक्षण विभागाचे व्यवस्थापक, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र व सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष वरावडेकर, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे कनिष्ठ संशोधन छात्र, डॉ. विकास भारंबे, डॉ. सानिका जोशी, अमित पोळ, गुहागर कृषी विभागाचे कृषी अधिकारी सागर आंबावकर, कृषिसेवक सतीश सपकाळ उपस्थित होते.
डॉ. वैभव राजेमहाडीक यांनी आपण सेंद्रिय शेतीकडे वळण्याची कारणमिमांसा करताना सांगितले, मोठ्या प्रमाणात होत असलेला रासायनिक खतांचा आणि कीटकनाशके इत्यादींचा वापर यामुळे मानवी आरोग्याला धोका तसेच जमिनीचे आरोग्यसुद्धा धोकादायक होत गेल्याने आपण सेंद्रिय शेतीकडे वळतो आहोत. कुठल्याही प्रकारचे रसायन न वापरता आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती करणे आणि स्वतःचे आरोग्य व जमिनीचे आरोग्य सांभाळणे. शेतीमध्ये खताचे योग्य प्रमाणात नियोजन, शेतीवरील कीड-भुंगा नियोजन व तण नियंत्रण करणे फारच गरजेचे असते.
नैसर्गिक साधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपरिक बियाण्यांचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती असे प्रशिक्षक अमित पोळ यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीमध्ये किटकांचे व्यवस्थापन करताना चिकट सापळा, कामगंध साफळा, फनेल सापळा इत्यादी सापळे वापरण्यात यावेत तसेच सुधारित नवीन बी-बियाणे आणि वाफा पद्धतीने शेती लागवड केली पाहिजे, असे मार्गदर्शन प्रशिक्षक सानिका जोशी यांनी केले. गांडूळखत, कंपोस्ट खत तसेच सेंद्रिय खत व फवारणीकशी तयार करावयाची यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com