
पुनर्वसनसाठी कुर्लीवासीयांचे धरणे
00252
सिंधुदुर्गनगरी ः येथे कुर्ली-बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
पुनर्वसनसाठी कुर्लीवासीयांचे धरणे
सिंधुदुर्गनगरीत आंदोलन; देवघर पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे (ता.वैभववाडी) बाधित झालेल्या कुर्ली-बौद्धवाडीतील कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी क़ुर्ली ग्रामस्थांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करून पुनर्वसनाची मागणी केली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुनर्वसन प्रस्ताव सादर करावा, असे आदेशित केले होते. त्यानुसार सप्टेंबर २०११ मध्ये अधीक्षक अभियंत्यांनी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांना दोन प्रतीत प्रस्ताव सादर केला होता. मात्र, या प्रस्तावाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पुनर्वसनाबाबत अद्यापही निर्णय होऊ शकला नाही. सरकारच्या या उदासिन धोरणाच्या विरोधात आणि पुनर्वसनाचा निर्णय तातडीने करावा, या मागणीसाठी क़ुर्ली-बौद्धवाडी धरणग्रस्तांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कुर्ली बौद्ध वस्तीची पुनर्वसनाची मागणी न्याय्य असल्याचे सांगून पुनर्वसन होईपर्यंत धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करू नये, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी वस्तीला भेट देवून वस्तुस्थितीची खातरजमा करून पुनर्वसन होईपर्यंत धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा न करण्याचे धोरण राबविले जात आहे; मात्र, तरीही या वस्तीच्या पुनर्वसनाचा निर्णय करण्यास का टाळले जात आहे? असा प्रश्न आहे. तरी कुर्ली बौद्धवस्तीच्या पुनर्वसनाचा निर्णय करून तातडीने पुनर्वसन करावे, या मागणीसाठी कुर्ली-बौद्धवाडी धरणग्रस्तांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये संपत देसाई, अंकुश कदम, रमेश सकपाळ आदी सहभागी आहेत.
-----------
चौकट
वस्तीही बाधित
२०११ मध्ये सादर केलेला सुधारीत प्रस्तावाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला तरी पुनर्वसनाचा कोणताही निर्णय झाला नाही. अथवा कोणतीही कार्यवाही झाली नाही. धरणाच्या बुडीत क्षेत्रात या वस्तीची सर्व शेतजमीन गेली आहे. इतकेच नव्हे तर वस्तीही बाधित होत आहे.